हिंजवडी वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक; आमदार शंकर जगताप यांच्या मागणीला त्वरित प्रतिसाद
१० जुलै रोजी मुंबईत विधान भवनात उच्चस्तरीय चर्चा; विविध विभागांचे अधिकारी सहभागी होणार
ही महत्त्वपूर्ण बैठक मुंबईच्या विधान भवनात गुरुवारी (१० जुलै) दुपारी १.४५ वाजता होणार असून, यामध्ये विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, आमदार आणि प्रशासनातील प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
शंकर जगताप यांचा पाठपुरावा:
आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, "हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीमुळे हजारो कर्मचारी त्रस्त झाले आहेत. त्यांचा वेळ, इंधन आणि मानसिक त्रास वाढत आहे. रस्ते, रिंगरोड, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग यंत्रणा यावर तातडीने काम होणे गरजेचे आहे." हिंजवडीसारख्या महत्त्वाच्या आयटी हबचा विकास करताना वाहतूक नियोजन आणि सुविधांकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा प्रश्न मोठा बनल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीसाठी निमंत्रण:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री (नगरविकास व गृहनिर्माण), उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन), नगरविकास राज्यमंत्री, आमदार शंकर जगताप व महेश लांडगे, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, पोलीस आयुक्त (पिंपरी-चिंचवड), जिल्हाधिकारी (पुणे) तसेच महामार्ग, मेट्रो व एमआयडीसी अधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
बैठकीचा उद्देश:
या बैठकीत हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यांचे विस्तार, नव्या जोडरस्त्यांची निर्मिती, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक आणि पार्किंगची व्यवस्था यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्र्यांनी इतक्या तातडीने बैठक बोलावल्याने नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेतली गेली आहे, हे समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. यातून काही ठोस निर्णय निघतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ही बैठक हिंजवडीतील नागरिक, आयटीयन्स आणि वाहनचालकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: