संजय राऊत 'सामना'चे नाही तर 'दैनिक दिशाभूल'चे संपादक
निवडणूक हरल्यावरच 'मतचोरी'चे आरोप; भाजपची काँग्रेस आणि उबाठा गटावर टीका
मुंबई, (प्रतिनिधी): मत चोरीचे बिनबुडाचे आरोप करणाऱ्या संजय राऊत, उबाठा गट आणि काँग्रेस यांची मती चोरीला गेली आहे, अशी जोरदार टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत जास्त मते मिळाल्यावर शांत बसलेले श्री. राऊत विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लगेचच आरोप करत असल्याचे श्री. बन म्हणाले. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते सोमवारी बोलत होते.
श्री. बन यांनी, 'सामना'च्या अग्रलेखातून कोणत्याही पुराव्याविना मतचोरीचा आरोप करत महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. "संजय राऊत हे 'सामना' या मुखपत्राचे नाही तर 'दैनिक दिशाभूल'चे संपादक आहेत," असा घणाघातही त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना राऊत यांनी कधीच तिलांजली दिली असल्याचेही ते म्हणाले.
एकीकडे मतचोरीचा आरोप करायचा आणि दुसरीकडे बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला विरोध करायचा, ही दुटप्पी भूमिका आहे. श्री. राऊत राहुल गांधी यांना बिहारमधील मतदार यादी पुनर्निरीक्षणाची गरज आहे, असे ठणकावून का सांगत नाहीत, असा सवालही श्री. बन यांनी केला.
भाजपा मुंबई अध्यक्ष निवडीवरून टीका करणाऱ्या राऊतांवरही त्यांनी प्रहार केला. भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळतो, इथे घराणेशाहीने पदे मिळत नाहीत, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर शरसंधान साधले. कोविड काळात मंदिरे बंद ठेवून मद्य विक्रीला परवानगी देणाऱ्यांनी मद्यविक्रीबद्दल बोलूच नये, असा इशारा देत श्री. बन यांनी दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाचा कोणत्या नातेवाईकांना फायदा होणार होता, हे स्पष्ट करण्याचे आव्हानही श्री. राऊत यांना दिले.
Navnath Ban
Sanjay Raut
BJP
Maharashtra Politics
Maha Vikas Aghadi
#NavnathBan #SanjayRaut #BJP #MaharashtraPolitics #MahaVikasAghadi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: