पिंपरी-चिंचवड शहराला पाणी कमी पडू देणार नाही
पिंपरी-चिंचवड - "पिंपरी-चिंचवड शहर हे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी पुरवले, तसेच भामा आसखेड धरणातून १६० एमएलडी पाण्याच्या योजनेचे भूमिपूजन केले आहे. पण एवढे पाणी देखील या शहरासाठी पुरेसे नाही. यामुळे विविध धरणांतून या शहराला अधिक पाणी पुरवण्यासाठी नवीन योजना आखली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणी समस्येची संपूर्णपणे सोडवणूक करण्यासाठी मी कटिबद्ध आहे," असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाकड येथे घेतलेल्या सभेत सांगितले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - आरपीआय (आठवले) महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेत फडणवीस यांनी "स्व. लक्ष्मणभाऊंनी या शहराच्या विकासात दिलेले योगदान पुढे नेण्यासाठी शंकर जगताप यांना विधानसभेत पाठवा," असे आवाहन केले. हजारोंचा जनसमुदाय सभेला उपस्थित होता.
मेट्रो व रिंगरोडद्वारे वाहतूक समस्येचे समाधान
चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प सुरू आहे. फडणवीस म्हणाले, "पब्लिक ट्रान्सपोर्टच्या सुविधा वाढवण्याच्या हेतूने पीएमपीएल व मेट्रोची सोय केली जात आहे. लवकरच २० हजार कोटींच्या रिंगरोड प्रकल्पाद्वारे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल."
विरोधकांवर फडणवीसांचा आरोप: ‘फेक नरेटिव्ह’ तयार करणारे नेते
फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना, "शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे हे ‘फेक नरेटिव्ह’ तयार करणारे नेते आहेत," असे म्हटले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले असल्याच्या अपप्रचारावर त्यांनी विरोध केला आणि "महाराष्ट्रातील ५२ टक्के गुंतवणूक महायुती सरकारच्या काळात आली आहे," हे सांगितले.
रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकार कटिबद्ध
ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आल्यामुळे, महाराष्ट्रात सुमारे १० लाख तरुणांच्या हाताला काम आणि २५ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. "राज्य सरकार या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षण व आर्थिक स्थैर्य देणार आहे," असे त्यांनी नमूद केले.
हिंजवडीतील आयटी उद्योगांबाबत अफवा न पसरवण्याचे आवाहन
हिंजवडीतील आयटी उद्योग बाहेर जात असल्याची अफवा पसरवल्याबद्दल त्यांनी विरोधकांवर टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की, "महाविकास आघाडीच्या काळात १३ उद्योग स्थलांतरित झाले होते, मात्र महायुतीच्या काळात फक्त ३ उद्योग बाहेर गेले आहेत."

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: