पिंपरी पोलीस स्टेशन दूर असल्याने व्यापाऱ्यांची गैरसोय; पोलीस चौकीतून तक्रार नोंदणीची मागणी
पिंपरी, पुणे, (प्रतिनिधी): पिंपरी कॅम्प परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटना आणि पोलिसांच्या उदासीन कारभाराविरोधात पिंपरी मर्चंट फेडरेशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पिंपरी कॅम्पमधील व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर, व्यापाऱ्यांनी गुरुवारी (दि. ७ ऑगस्ट २०२५) बाजारपेठ बंद ठेऊन पोलिसांचा निषेध केला. यावेळी पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी पोलीस गस्त वाढवण्याची आणि व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
श्रीचंद आसवानी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी कॅम्प परिसरात पूर्वीप्रमाणे २४ तास पोलीस तैनात करावेत आणि बाजारपेठेत दुचाकीवरील मार्शल राऊंड पुन्हा सुरू करावेत. पिंपरी मंडई जवळील पोलीस चौकीतील मागील पाच वर्षांपासून बंद असलेला लँडलाईन फोन त्वरित सुरू करावा, जेणेकरून दुर्घटना, चोरी, मारामारी किंवा अपघातासारख्या घटना घडल्यास संपर्क साधणे सोपे होईल.
आसवानी यांनी असेही म्हटले आहे की, पूर्वी या पोलीस चौकीमध्ये तक्रारी नोंदवून घेतल्या जात होत्या, मात्र आता ते बंद झाले आहे. पिंपरी पोलीस स्टेशन बाजारपेठेपासून ४ ते ५ किलोमीटर लांब असून, तेथे तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यास ठाणे अंमलदार व्यापाऱ्यांना अनेक प्रश्न विचारून हैराण करतात. पथारीवाल्यांना हटवण्याऐवजी पोलीस त्यांनाच संरक्षण देत असल्याचा आणि दुकानदारांना त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मागील आठवड्यात पिंपरी कॅम्पमधील व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबार घटनेतील आरोपीला कडक शिक्षा द्यावी, अशी मागणीही आसवानी यांनी केली आहे.
Pimpri Camp
Police Patrol
Traders Protection
Srichand Aswani
Pimpri Merchant Federation
#PimpriCamp #PolicePatrol #TradersSafety #PimpriNews #LawAndOrder #MerchantFederation
Reviewed by ANN news network
on
८/०८/२०२५ ११:२७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: