मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाय योजनांसाठी महाराष्ट्र शासनाकडून भारतीय तट रक्षक दलासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांच्यासह महाराष्ट्राचे कमांडर तथा महासंचालक अनुराग कौशिक, निवृत्त कमांडर मिलिंद पाटील यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत श्री. बाडकर यांच्यासह या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना महाराष्ट्रातील सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाययोजनांबाबत माहिती दिली. तट रक्षक दलाच्या रत्नागिरी येथील हवाई सुरक्षा सुविधांचा आढावा सादर केला. विशेषतः वरळी येथील सुविधांचे तत्काळ अद्ययावतीकरण आवश्यक असल्याचे सांगितले.
त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वरळीसह, राज्यातील सागरी परिक्षेत्रात तट रक्षक दलासाठी आवश्यक अशा सोयी-सुविधा उभारणी करिता महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: