'असाध्य ते साध्य, करवीती सायास, कारण अभ्यास तुका म्हणे!': मारुती भापकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पिंपरी, दि. २४ जून २०२५: चिंचवड येथील मोहनगरमध्ये 'जय भवानी तरुण मंडळ' च्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला. मोहननगर येथील शिवपार्वती कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, उद्योजक लक्ष्मण म्हेत्रे, सागर धुमाळ, गणेश दातीर पाटील, राजेंद्र घावटे, कमलेश लुकंड, सयाजी भांदिगिरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक मारुती भापकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. भावी जीवनात त्यांना यशासाठी सदिच्छा देताना, भापकर यांनी विद्यार्थ्यांना उच्च ध्येये ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "आयएएस, आयपीएस, डॉक्टर, इंजिनियर होण्याचे उच्चतम लक्ष साध्य करण्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 'असाध्य ते साध्य, करवीती सायास, कारण अभ्यास तुका म्हणे!' हा संदेश कायम लक्षात ठेवावा. आपल्या पालकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याकरता आपली वाटचाल कायम ठेवावी."
या सत्कार समारंभात एसएससी बोर्डाचे माजी सहाय्यक सचिव अनिल गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक गुणवत्ता, स्वतःचा आनंद आणि त्यानुसार करिअर निवडण्याबाबत मोलाचे सल्ले दिले. पालकांना मार्गदर्शन करताना गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना सांभाळण्याबाबत, त्यांना सहकार्य करण्याबाबत आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याबाबत आवाहन केले. "प्रत्येक विद्यार्थी हा एक कोहिनूर हिरा असतो, त्यामध्ये एक गुण सर्वोत्तम असतो. त्या गुणाला शोधून त्याला पैलू पाडले, तर त्याचे आयुष्य आनंदी होते आणि आनंदी आयुष्य म्हणजेच आपले करिअर. या दृष्टीने पालक आणि विद्यार्थ्यांनी आपली दहावी नंतरची शाखा निवडणे आवश्यक आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, दहावीला मिळालेले गुण किंवा बारावीचा निकाल याकडे सकारात्मकपणे पाहणे, निकाल समजून घेणे, त्यावर विचार करणे, मुलांच्या आवडीच्या गुणांची यादी करणे आणि त्यानुसार पुढील शाखा निवडणे आवश्यक असल्याचे श्री. गुंजाळ यांनी सांगितले.
या कार्यक्रमात दहावी-बारावीसह उत्तम पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केले होते, तर प्रणाली नवले यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी दिगंबर बालुरे, सतीश शर्मा, शिवाजी गोणते, विशाल भालेराव, पप्पू दाभोळे, दत्ता वाघमोडे, नाना खरात, सतीश चव्हाण, डिप्यु भोसले, आदेश लुकंड आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Pimpri Chinchwad, Education, Student Felicitation, Community Event, Youth Empowerment, Career Guidance, Sant Tukaram, SSC, HSC
#StudentFelicitation #PimpriChinchwad #Mohannagar #EducationSuccess #CareerGuidance #SantTukaram #YouthEmpowerment #ExamResults #CommunitySupport #AcademicExcellence
Reviewed by ANN news network
on
६/२४/२०२५ ०२:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: