पुण्यात ‘गांधी दर्शन’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; लोकशाही, माध्यमे, श्रद्धेवर विचारमंथन

 


पुणे: महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, ८ जून २०२५ रोजी कोथरूड येथील गांधी भवनमध्ये आयोजित ‘गांधी दर्शन’ शिबीर मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या भरघोस प्रतिसादात पार पडले. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत झालेल्या या शिबिरात विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.

या शिबिराला ज्येष्ठ विधितज्ञ अॅड. उल्हास बापट, मुक्त पत्रकार प्रशांत कदम, आणि दिग्दर्शक मंजुल भारद्वाज यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. शिबीर यशस्वी करण्यासाठी एड. स्वप्नील तोंडे, तेजस भालेराव, एड. राजेश तोंडे, अप्पा अनारसे यांचे विशेष योगदान लाभले, तर अन्वर राजन, ज्ञानेश्वर मोळक, संदीप बर्वे, इब्राहिम खान, डॉ. श्रुती पानसे, संदीप देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘गांधी दर्शन’ मालिकेतील हे २१ वे शिबिर महात्मा गांधींच्या विचारांचे नव्या पिढीला मार्गदर्शन मिळावे आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने आयोजित करण्यात आले होते. शिबिरात सत्य, अहिंसा, सामाजिक बांधिलकी आणि स्वावलंबन या गांधी विचारसरणीच्या मूलभूत तत्त्वांवर सखोल संवाद झाला, ज्यामुळे युवकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली.

यावेळी, अॅड. उल्हास बापट यांनी ‘न्यायपालिका व कार्यपालिका यांच्यामधील संघर्ष आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका’ या विषयावर मौलिक विचार मांडले. ते म्हणाले, “सर्व जगाचा अभ्यास केला असता, भारतातच लोकशाही व्यवस्थित टिकली आहे असे मानले जाते. लोकशाहीवर संकट येतात, पण त्या संकटांना उत्तरे दिली जातात आणि लोकशाही टिकते. भारतीय घटना जगातील सर्व चांगल्या गोष्टी घेऊन तयार झाली आहे. पंडित नेहरूंनी लोकशाहीची पाळेमुळे रुजवली. मात्र, आज भारतीय लोकशाही संसदीय न राहता ‘पंतप्रधान लोकशाही’ झाली आहे. निवडणूक आयोग आणि माध्यमे कितपत स्वतंत्र राहिली आहेत, हे सर्वश्रुत आहे. आतापर्यंत पंतप्रधानांवर अंकुश ठेवण्याचे काम जनतेनेच केले आहे. सध्या नैतिकतेचा ऱ्हास झाला आहे. घटनात्मक बाबींवर सर्वोच्च न्यायालयाने ३ महिन्यात निकाल दिले पाहिजेत.”

मुक्त पत्रकार प्रशांत कदम यांनी ‘माध्यमांचा उन्माद आणि नवराष्ट्रवाद’ यावर स्पष्ट आणि परखड मांडणी केली. दिग्दर्शक मंजुल भारद्वाज यांनी ‘आस्था, श्रद्धा आणि संविधान’ या विषयावर प्रभावी भाष्य करत आजच्या समाजातील मूल्यांची चर्चा उपस्थितांसमोर मांडली. मंजुल भारद्वाज म्हणाले, "आपण भारतीय लोक आस्था, श्रद्धा बाळगून असतात, म्हणूनच आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय नाही. प्रस्थापित व्यवस्थेला आपण प्रश्न विचारत नाही. प्रश्नांना सत्ता घाबरते, म्हणून प्रश्न विचारत राहिले पाहिजे. अंधविश्वास ठेवता कामा नये. विवेकबुद्धी प्रमाण मानली पाहिजे."

डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महात्मा गांधींच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता विषद केली. शिबिरात विविध सत्रांमधून गांधीवादाची आधुनिक संदर्भातील उपयुक्तता अधोरेखित करण्यात आली.

  • ---------------------------------------------------------------------------------------------------------------Gandhi Vichar, Public Event, Workshop, Pune, Democracy, Media, Values, Social Transformation
  •  #GandhiDarshan, #PuneEvents, #GandhianPhilosophy, #Democracy, #YouthRevolution, #SocialTransformation
पुण्यात ‘गांधी दर्शन’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; लोकशाही, माध्यमे, श्रद्धेवर विचारमंथन पुण्यात ‘गांधी दर्शन’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; लोकशाही, माध्यमे, श्रद्धेवर विचारमंथन Reviewed by ANN news network on ६/०८/२०२५ ०५:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".