कन्नूर (केरळ): सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी तथा महर्षींच्या आज्ञेनुसार देश-विदेशात धर्मप्रसारासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना प्रतिष्ठित 'ॐ शिव शक्ति ॐ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केरळमधील 'शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट'च्या वतीने हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
आंतरिक शक्ती, दृढ निश्चय आणि कृपाशीर्वादांच्या माध्यमातून समाजाला दिशादर्शन करणाऱ्या महिलांसाठी हा पुरस्कार विशेषत्वाने दिला जातो. 'सनातन एकल वास्तूरत्न'चे कुलपती ब्रह्मश्री डॉ. सोमनाथ राघवन् आचार्य यांच्या हस्ते श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'शिवोहम् स्पिरिच्युअल वेलनेस सेंटर'च्या मुख्य चिकित्सक डॉ. ज्योती शमिथ यांनी प्रमाणपत्र देऊन आणि सौ. सुधा रविंद्रनाथ यांनी शाल अर्पण करून त्यांचा विशेष सन्मान केला.
'शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट' ही अध्यात्म, संस्कृती, ध्यान, योग यांसारख्या विषयांबाबत समाजात जागृती निर्माण करणारी संस्था असून, ही संयुक्त राष्ट्रांच्या 'यू.एन्. ग्लोबल कॉम्पॅक्ट'शी संलग्न आहे.
पुरस्कार स्वीकारताना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भावना व्यक्त करताना म्हटले, "हा पुरस्कार माझा नसून आमचे गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आहे. मी केवळ एक माध्यम आहे. गुरुकृपेमुळेच आपण जीवनात यशस्वी होतो. गुरुदेवांच्या कृपेनेच आपले जीवन सात्त्विक होते आणि जीवनाला अर्थपूर्ण दिशा मिळते." त्यांनी पुढे सांगितले की, "डॉ. आठवले यांनी 'मनुष्यजन्माचा प्रमुख उद्देश ईश्वरप्राप्ती करणे हाच आहे' हे मनावर बिंबवून समाजाला अध्यात्म आणि साधनेकडे वळवले आहे. साधनेमुळे व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक कर्म सात्त्विक झाले, तर ईश्वरप्राप्ती दूर नाही. समाजात साधनेचा प्रचार-प्रसार करणे आणि समष्टी साधनेविषयी अवगत करणे हा आपला धर्म आहे, ज्यामुळे समाजात जागृती निर्माण होईल आणि आपले राष्ट्र सात्त्विक होईल."
कार्यक्रमात ब्रह्मश्री डॉ. सोमनाथ राघवन् आचार्य म्हणाले, "आपल्या गुरूंचे कृपाशीर्वाद आणि त्यांचा परीसस्पर्श लाभल्यास आपण अध्यात्माच्या मार्गावर प्रगती करू शकतो." 'जागतिक शांतता संघटने'चे आंतरराष्ट्रीय महासचिव प्रा. डॉ. सुरेश के. गुप्तन् यांनी जागतिक मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत म्हटले, "जगातील ६५ टक्के लोकांमध्ये निराशा दिसून येते. या सर्व आजारांचे मूळ मानवी भावनांवरील नियंत्रणाचा अभाव हे आहे."
शिवोहम् ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सी.व्ही. रविंद्रनाथ यांच्या कन्या शुभा रविंद्रनाथ यांनी सर्वांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'निर्वाण षट्कम'चे पठण करण्यात आले. 'कृष्णा बिच रिसॉर्ट'चे श्री. सुमल यांनी आभारप्रदर्शन केले.
.....................................................
#ShivShaktiAward
#AnjaliGadgil
#SanatanSanstha
#SpiritualLeadership
#KeralaNews
#ShivohmTemple
#SpiritualAwareness
#DharmaPrachar

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: