महात्मा गांधी लिखित 'सत्याग्रह विचार'च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन

 


'लोकशाही हीच सत्याग्रहाची फलश्रुती' :डॉ. अशोक चौसाळकर

पुणे : 'अगदी लहान मुलाला  सत्याग्रहातून आत्मबळ   मिळाल्याने स्वातंत्र्य लढा व्यापक झाला आणि भारताला लोकशाही मिळाली ,हीच सत्याग्रहाची फलश्रुती आहे', असे प्रतिपादन ज्येष्ठ विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांनी बुधवारी सायंकाळी केले.

 राष्ट्रपिता महात्मा गांधी लिखित 'सत्याग्रह विचार' या पुस्तकाच्या चौथ्या खंडाच्या  नव्या आवृत्तीचे प्रकाशन  बुधवार,दि.२४ एप्रिल रोजी  सायंकाळी ६ वाजता गांधी भवन(कोथरूड) येथे ज्येष्ठ विश्लेषक प्रा.डॉ.अशोक चौसाळकर यांच्याहस्ते झाले.यावेळी चौसाळकर बोलत होते.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  होते.

संयोजन समितीच्या वतीने अन्वर राजन,संदीप बर्वे आणि जांबुवंत मनोहर यांनी स्वागत केले.

महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांचे विचार मराठीत यावेत यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब देवगिरीकर यांनी विशेष प्रयत्न केले.त्यातून 'सत्याग्रह विचार' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. प्रथमावृत्तीचे प्रकाशन मामासाहेब देवगिरीकर यांच्याहस्ते झाले  होते.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे द्वितीय अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे.महात्मा गांधींच्या विचारांचे सार या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे एकूण २० खंड आहेत.त्यातील चौथ्या खंडाच्या  पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन या कार्यक्रमात झाले. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अन्वर राजन, अरूण खोरे, संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर आदी उपस्थित होते. अभय देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.प्रास्ताविक अन्वर राजन यांनी केले.

डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले,' महात्मा गांधी यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चे प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत. सत्याग्रहाचे आचरण आणि त्याचा आशय अंगी बाणवला पाहिजे.सत्याग्रह ही मजबुरी नाही. तर अन्याय सहन न करता तीव्र आणि अहिंसात्मक प्रतिकार करणे हे सत्याग्रहाचे सार आहे. निर्भिडपणा येतो. भीतीने नैतीक अधःपतन होते.आत्मबळाने आपण व्यवस्थेला आव्हान देऊ शकतो. सत्याग्रहाने सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर परिणाम होतात.सत्याग्रह करणाऱ्यांचा उपहास, निंदा केली जाते, दडपशाही केली जाते. सत्याग्रहाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होतो.या कसोट्यातून उत्तीर्ण झाल्यावर आदर निर्माण होतो.व्यक्तीच्या ह्रदय परिवर्तनासाठी सत्याग्रह आवश्यक आहे. सत्याग्रहीने उद्दीष्टापासून हटू नये. सत्याग्रहींच्या सामूहिक आत्मबळातून देखील मोठे परिवर्तन घडते.भौतिक लाभ मिळवणे हा सत्याग्रहाचा उद्देश नसतो, असेही डॉ. चौसाळकर यांनी सांगितले.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,' परिवर्तनासाठी आपण रोज प्रयत्न केले तर सामान्य माणूस देखील महात्मा होतो, ही सत्याग्रह आणि सर्जनशिलतेची ताकद आहे. समाजवादी मंडळी गांधीवादी झाल्याशिवाय ते काल सुसंगत ठरणार नाहित.लोकशाहीची प्रतिनिधि शाही होवू नये असे वाटत असेल तर सत्याग्रह सामाजिक जीवनात असला पाहिजे. वैयक्तिक जीवनात देखिल सत्याग्रह हे महत्वाचे मूल्य आहे'.

महात्मा गांधी लिखित 'सत्याग्रह विचार'च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन महात्मा गांधी लिखित 'सत्याग्रह विचार'च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन Reviewed by ANN news network on ४/२४/२०२४ ०८:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".