रत्नागिरी : जागतिक तापमान वाढीचा आणि वाढत्या प्रदुषणाचा विचार करता, पर्यावरणाचे रक्षण करणे हे आवश्यक आहे. किंबहुना प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्यच आहे. पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड अत्यंत गरजेची आहे. त्यादृष्टीने कादंळवन जतन व लागवड करणे अतिशय महत्वाचे आहे असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
मौजे आरे येथे वनविभाग महाराष्ट्र शासन व कांदळवन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांदळवन रोपवन लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रत्नागिरीचे प्रांतधिकारी विकास सुर्यंवशी, विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, रत्नागिरीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे, आरे काळबादेवी सरपंच तृप्ती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, कांदळवन हे इतर यंत्रणेपेक्षा सहापट कार्बनडाय ऑक्साईड वायू शोषून घेऊन तेवढयाच पटीने ऑक्सीजन बाहेर टाकते. कोविड सारख्या रोगांवरही कांदळवन लागवड व जतन करुन प्रतिबंध करता येऊ शकते.
जिल्हयातील विद्यार्थ्यांना कांदळवनाची संकल्पना समजली पाहिजे. कांदळवन लागवड व विकसीत का करतो आहोत ? हे विद्यार्थ्यांना समजणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थी तसेच नागरिकांना कांदळवन लागवडीमध्ये पुढाकार कशा पध्दतीने घेईल यासाठी वन विभागाने पुढाकार घ्यावा अशा सूचना करुन ते म्हणाले, रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासाकरिता आपण कटिबध्द असून मुलांमध्ये विज्ञानाबद्दल आकर्षण निर्माण व्हावे या हेतूने रत्नागिरी येथे तारांगण उभे करण्यात आले. कोकणातील पहिले प्राणी संग्रहालय मालगुंड येथे ५० एकर जागेवर होत आहे. बर्ड पार्क, स्नेक पार्क, साऊथ अफ्रिकेशी अथवा जयपूरशी टायअप करुन पांढऱ्या रंगाचा पाढंरा पटेरी वाघ आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे नक्कीच पर्यटक वाढतील आणि ते वाढल्याने येथील रोजगार वाढेल. सिंधुरत्न योजनेतून यासाठी 75 कोटीचा निधी देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच पुढील जागतिक पर्यावरण दिनी प्राणी संग्रहालय सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तत्पूर्वी विभागीय वन अधिकारी दिपक खाडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.
जलजीवन मिशन आढावा बैठक :-
कांदळवन रोप लागवडपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे सकाळी 8.30 च्या सुमारास जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली आणि प्रलंबित कामे ही उत्तम गुणवत्तेची आणि वेळवर पूर्ण करा अशी सूचना केली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: