निगडी : विवेकाचा आवाज हा समाजाचा आवाज असतो. सध्या चिंता वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजात संभ्रम निर्माण होत आहे अशावेळी समाजाचा आरसा असणा-या लेखकांनी विवेकाचा आवाज ऐकलाच पाहिजे आणि ती आजच्या काळाची नितांत गरज आहे असे विचार येत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले.
उदगीर येथे होणा-या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या सन्मानार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड च्या वतीने शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ, सचिव संजय जगताप, कार्यकारिणी सदस्य माधुरी मंगरुळकर, किशोर पाटील, विविध संस्थांचे प्रतिनिधी माधव राजगुरु, प्रा. अशोक पगारिया, संपत गर्जे, डी. बी शिंदे, अविनाश कांबीकर, प्रशांत थोरात आदी उपस्थित होते.
सासणे पुढे म्हणाले, जो कोणी संमोहनातून जागृत करण्याचा प्रयत्न करतो तो काही दुष्ट प्रवृत्तींना आवडत नसतो. कोंबडा पहाटे जागृत करण्याचे काम करतो, तो सर्वाधिक मारला जातो हे ध्यानात ठेवले पाहिजे. लेखकाने भीती न बाळगता आपल्या लेखणीने जागृती निर्माण केली पाहिजे आणि अंधारातील सत्य उलगडले पाहिजे.
राजन लाखे यांनी सासणे यांच्या साहित्यसंपदेचा आढावा घेतला. संमेलनात बालसाहित्यावर परीसंवाद होण्याची गरज, मराठीवर हिंदीचा प्रभाव, वाचन संस्कृती लोप पावत चालल्याची खंत या संबंधात राजगुरु, प्रकाश निर्मळ, सुरेखा कटारिया यांनी विचारलेल्या प्रश्नांना सासणे यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली.
यावेळी कटारिया यांची ध्वनिफीत तसेच मराठी साहित्य व कला मंडळाच्या साहित्य दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. संजय जगताप यांनी आभार मानले.
सध्या चिंता वाटावी अशी परिस्थिती : भारत सासणे
Reviewed by ANN news network
on
१/०८/२०२२ ०९:५७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: