बीड, २४ जून २०२५: बहुचर्चित सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे. आज (मंगळवार) या खटल्याचे कामकाज सुमारे तीन तास चालले, ज्यात आरोपी वाल्मीक कराड यांच्या वकिलांनी दोन तास, तर विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी एक तास युक्तिवाद केला. हा संपूर्ण युक्तिवाद केवळ आरोपीच्या दोषमुक्ती अर्जावर केंद्रित होता.
माध्यमांशी बोलताना ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, वाल्मीक कराड याचा संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सहभाग नाही आणि त्याला मकोका (MCOCA) लागू होत नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला. या युक्तिवादाला आपण तीव्र विरोध केल्याचे निकम यांनी स्पष्ट केले. "आम्ही आमचे पुरावे सादर केले आणि कटाचा सूत्रधार नेहमी पडद्यामागे राहून आपल्या कटपुतळ्यांच्या माध्यमातून दुष्कृत्ये घडवून आणतो," असे प्रतिपादन करत निकम यांनी कराडच्या भूमिकेवर भर दिला. न्यायालयाने या युक्तिवादानंतर ७ जुलैपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे.
दरम्यान, आरोपी वाल्मीक कराड यांचे वकील मोहन यादव यांनी माध्यमांना सांगितले की, विशेष सरकारी वकिलांनी मकोका लावणे योग्य असल्याचे म्हटले आहे, परंतु मुंबई बॉम्बस्फोटासारख्या प्रकरणांचा रेफरन्स या केसला लागू होणार नाही, असे आमचे मत आहे. यादव यांच्या मते, "त्यांचं (सरकारी पक्षाचं) पूर्वीपासून म्हणणं आहे की वाल्मीक कराड हा मुख्य सूत्रधार आहे. मात्र, आमचं म्हणणं आहे की याला कोणताही पुरावा नाही. अर्थ तुम्ही लावला आहे, पण पुरावा नाही." आज केवळ दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद झाला असून, मालमत्ता जप्तीवर कोणताही युक्तिवाद झाला नाही, असेही त्यांनी नमूद केले. काही गोष्टी न्यायालयाच्या हातात असतात, पोलिसांच्या नाहीत, असेही यादव म्हणाले.
या प्रकरणातील पुढील सुनावणी आणि न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
Murder Case, Court Proceedings, Beed News, Legal Battle, High-Profile Case
#SantoshDeshmukhMurder #Beed #UjjwalNikam #CourtCase #LegalNews #MurderTrial #MaharashtraNews #JusticeSystem #ValmikKarad

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: