नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची पुन्हा मागणी
उरण, दि. २४ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावरून महाराष्ट्र सरकारवर पुन्हा दबाव वाढला आहे. पाटील यांच्या १२ व्या स्मृतिदिनी कामगार नेते महेंद्र घरत यांनी सरकार किती दिवस चालढकल करणार, असा रोखठोक सवाल करत, विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची मागणी केली.
मंगळवारी (२४ जून) लोकनेते दि. बा. पाटील यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त घरत यांनी सकाळी ९ वाजता जासई येथे दिबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पनवेल येथील संग्राम बंगला येथे दिबांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी अतुल पाटील, मनीषा पाटील आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना घरत म्हणाले, "दि. बा. पाटील शेवटच्या श्वासापर्यंत न्याय हक्कांसाठी लढले. देशपातळीवरील गोरगरिबांसाठी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलेल्या नेत्यांमध्ये ते आहेत." उरणमध्ये प्रकल्पग्रस्तांचे जे ऐतिहासिक आंदोलन झाले, त्याचे ते प्रणेते असून त्या आंदोलनात पाच हुतात्मे झाले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. "त्यामुळे यांची जाण ठेवून तरी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावाबाबत आजतरी सरकारला सुबुद्धी सुचेल का? दिबांचा आज १२ वा स्मृतिदिन आहे, म्हणजे ते जाऊन एक तप झाले. सरकार किती दिवस चालढकल करणार," असा सवाल त्यांनी सरकारला केला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत काॅ. भूषण पाटील जासई येथे उपोषणाला बसले असून, महेंद्रशेठ घरत यांनी काँग्रेसच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा दिला. "दि. बा. पाटील ही आमची अस्मिता आहे, तिला नख लावण्याचे धाडस कुणी करू नये," असे ठाम मतही घरत यांनी व्यक्त केले.
Navi Mumbai, Airport Naming, D.B. Patil, Project Affected Persons, Political Demand, Mahendrasheth Gharat, Congress, Farmer Leader, Urab, Maharashtra
#NaviMumbaiAirport #DBPatil #AirportNaming #MahendrashethGharat #ProjectAffected #FarmersRights #Uran #MaharashtraPolitics #Congress #JusticeForFarmers

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: