"आणीबाणीत संविधानाचा गळा घोटल्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का?" - खा. रविशंकर प्रसाद यांचा सवाल

 

मुंबई, २५ जून २०२५: आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री खा. रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. "आणीबाणीच्या काळात अनेक घटना दुरुस्त्या करून संविधानाचा गळा घोटण्यात आला. देशाला तुरुंग बनवून विरोधी कार्यकर्त्यांचा छळ केल्याबद्दल आणि जबरदस्तीने नसबंदी शस्त्रक्रिया करून सामान्य जनतेवर अत्याचार केल्याबद्दल काँग्रेस नेते माफी मागणार का?" असा संतप्त सवाल खा. प्रसाद यांनी बुधवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

मुंबई भाजप कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते भाई गिरकर, आ. अमित साटम, मुंबई भाजपा कोषाध्यक्ष किरीट भन्साळी आणि प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.

आणीबाणीतील दडपशाहीची आठवण: 

खा. प्रसाद यांनी आणीबाणीतील अत्याचारांचा पाढा वाचताना सांगितले की, त्या काळात देशभरात दीड लाख लोकांना अटक करण्यात आली होती. जनसंघ, समाजवादी अशा सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. लोकनायक जयप्रकाश नारायण आणि मोरारजीभाई देसाई यांना हरयाणातील एकाच तुरुंगात ठेवले असले तरी, त्यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि जनसंघाच्या कार्यकर्त्यांचा तुरुंगात शारीरिक छळ करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

पत्रकार आणि सामान्य जनतेवरील अत्याचार: 

पत्रकारांवरील दडपशाहीचा उल्लेख करताना खा. प्रसाद म्हणाले की, आणीबाणी काळात २५३ पत्रकारांना अटक करण्यात आली. त्यापैकी ११० पत्रकारांना मिसा (MISA) कायद्याखाली, ११० जणांना संरक्षणविषयक कायद्यानुसार तर ३३ जणांना अन्य गंभीर गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. अनेक ज्येष्ठ संपादकांनाही तुरुंगात डांबण्यात आले. ५२ विदेशी पत्रकारांची मान्यता रद्द करण्यात आली, तर ख्यातनाम पत्रकार मार्क टली यांच्यासह २९ विदेशी पत्रकारांना भारतात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली. वृत्तपत्रांवर प्रसिद्धीपूर्व निर्बंध (प्री-सेन्सॉरशिप) लादण्यात आले होते.

सामान्य जनतेवरील अत्याचारांबद्दल बोलताना खा. प्रसाद यांनी जबरदस्तीने केलेल्या नसबंदी शस्त्रक्रियांचा मुद्दा मांडला. सरकारी अधिकाऱ्यांना नसबंदीचे उद्दिष्ट ठरवून दिले जात होते आणि ६० लाख लोकांची जबरदस्तीने नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. अनेकांचा विवाह झाला नसतानाही त्यांची नसबंदी करण्यात आली, असे धक्कादायक वास्तव त्यांनी समोर आणले. खा. प्रसाद यांनी तीव्र शब्दांत सांगितले की, काँग्रेस नेत्यांनी आजवर या अत्याचारांबद्दल माफी मागितली नाही.


Emergency India, Ravishankar Prasad, BJP, Congress, Constitution, Human Rights, Press Freedom, Forced Sterilization, Political Dissent

 #Emergency1975 #RavishankarPrasad #BJP #Congress #Constitution #HumanRights #PressFreedom #ForcedSterilization #IndianPolitics #DemocracyUnderThreat #NeverForget

"आणीबाणीत संविधानाचा गळा घोटल्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का?" - खा. रविशंकर प्रसाद यांचा सवाल "आणीबाणीत संविधानाचा गळा घोटल्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का?" - खा. रविशंकर प्रसाद यांचा सवाल Reviewed by ANN news network on ६/२५/२०२५ ०८:१२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".