विकासाला प्राधान्य देत मोदी सरकाऱचा भ्रष्टाचार, घोटाळे आणि तुष्टीकरणाला पूर्णविराम : शत्रुघ्न काटे


 

पिंपरी-चिंचवड: गेल्या ११ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पारदर्शकता, प्रामाणिकता, गतीशीलता आणि निर्णयक्षमतेसह कार्य करत भ्रष्टाचार, घोटाळे आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला पूर्णविराम देऊन विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे गौरवोद्गार भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी काढले. 'शासन म्हणजे सेवा' ही संकल्पना मोदी सरकारने प्रत्यक्षात आणल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने यशस्वीरित्या ११ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर भाजपने मोरवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सरकारच्या 'सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण' या त्रिसूत्रीवर आधारित विविध योजना, महत्त्वपूर्ण निर्णय आणि प्रभावी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. 'आत्मनिर्भर भारत' ते 'विकसित भारत' अशा दूरदृष्टीच्या संकल्पाकडून भारताने सिद्धीकडे यशस्वी वाटचाल केली असून, या ११ वर्षांतील अभूतपूर्व कार्यक्षमतेवर त्यांनी प्रकाश टाकला.

यावेळी आमदार अमित गोरखे, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, चंद्रकांत नखाते, संतोष कलाटे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, सरचिटणीस संजय मंगोडेकर, अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, भाजप ओबीसी आघाडी प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, भाजप भटके-विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, सोशल मीडिया प्रभारी संजीवनी पांडेय, सोशल मीडिया प्रमुख अमेय देशपांडे आदी उपस्थित होते.

प्रशासनात पारदर्शकता आणि ऐतिहासिक निर्णय:

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवले गेले. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीमुळे योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने मध्यस्थांचा वाटा पूर्णपणे संपला आहे. वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीमुळे करप्रणालीत सुसूत्रता येऊन भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. याच काळात कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरचा भारताशी असलेला संबंध अधिक दृढ करण्यात आला, जो एक ऐतिहासिक निर्णय ठरला, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या विकासासाठी भरीव योगदान:

महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने भरीव योगदान दिले असल्याचे सांगताना काटे म्हणाले की, रेल्वेसाठी तब्बल पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रात सध्या सुरू आहेत. मागील यूपीए सरकारने १० वर्षांत दिलेल्या एकूण निधीपेक्षा अधिक निधी मोदी सरकारने केवळ एका वर्षात महाराष्ट्राला दिला आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रात राज्यात ६ लाख कोटी रुपयांची कामे वेगाने सुरू आहेत. 'प्रत्येकाला घर' देण्याच्या संकल्पाकडे वाटचाल करत या सरकारने ३० लाख घरे देण्याचा विक्रम केला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प, जे गेली ४० वर्षांपासून रखडले होते, ते मोदी सरकारच्या काळात मार्गी लागले आणि आता पूर्णत्वाकडे जात आहेत.

गरीब कल्याण हे केंद्रबिंदू:

गरीब कल्याण हे मोदी सरकारच्या धोरणांचे केंद्रबिंदू राहिले आहे, असे काटे यांनी स्पष्ट केले.

  • अन्नसुरक्षा: ८१ कोटी लोकांना मोफत अन्नधान्याचे वाटप.
  • जल जीवन मिशन: १५ कोटी लोकांना नळ जोडणी.
  • आयुष्मान भारत योजना: ५ लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा, लाखो गरिबांना आरोग्य कवच.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजना: करोडो महिलांना स्वयंपाकासाठी मोफत गॅस कनेक्शन.
  • जनधन खाती: ५५ कोटी जनधन खाती उघडून बँकिंग सेवांचा सर्वसामान्यांपर्यंत विस्तार.
  • पंतप्रधान आवास योजना, जल जीवन मिशन, किसान सन्मान निधी: यांसारख्या योजनांमुळे गरीब, ग्रामीण आणि शेतकरी समाजाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले.
  • मुद्रा योजना: ५२ कोटींपेक्षा जास्त लोकांना स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळाले.
  • दारिद्र्यरेषेच्या वर: समाजातील वंचित घटकांना थेट लाभ देऊन २५ कोटींपेक्षा जास्त लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात यश.
  • उडान योजना: दीड कोटी भारतीयांनी विमान प्रवास केला असून, ७४ विमानतळांवरून १६० विमानतळांपर्यंत वाढ झाली आहे.
  • वंदे भारत एक्सप्रेस: संख्या १३६ असून, लवकरच ४०० पर्यंत पोहोचेल.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय:

  • देशाचे बजेट १ लाख ३७ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असून, ३ लाख ७ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.
  • सिंचन प्रकल्पांमध्ये जवळपास २५ हजार कोटी रुपये गुंतवून सिंचनाच्या सोयी वाढवण्यात आल्या.
  • किमान आधारभूत किंमतीत (MSP) सातत्याने वाढ.
  • मध निर्यात ११ वर्षांत तिप्पट झाली.
  • सौर पंपांची संख्या १० लाखांपर्यंत वाढली.
  • सहकार मंत्रालयाची स्थापना करून साखर कारखानदारीला ५० वर्षांत न झालेली प्रचंड मदत (एनसीडीसी मार्फत ५५ हजार कोटी).

महिला आणि युवकांचे सक्षमीकरण:

महिला आणि युवकांसाठी विविध योजना राबवून त्यांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे.

  • नारी शक्ती: ३३% आमदार-खासदार आरक्षणाचे धोरण.
  • नियंत्रण रेषेवर (LOC) पहिल्यांदा महिलांची तुकडी तैनात.
  • ७३% घरे महिलांच्या नावावर.
  • ३ कोटी 'लखपती दीदी' तयार झाल्या असून, महाराष्ट्राने १ कोटी 'लखपती दीदी' बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
  • ९० लाख महिलांचे बचत गट तयार करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले.
  • माता मृत्यू दरात लक्षणीय घट होऊन तो ८० पर्यंत खाली आला.
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: शिक्षण वैश्विक करण्याचे प्रयत्न सुरू.
  • ८ नवीन आयआयएम आणि ४९० नव्या विद्यापीठांची स्थापना.
  • १८-२८ वयोगटातील ३ कोटी मुलांचे ईपीएफओ खाते उघडण्यात आले.
  • १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय नोकरदार आणि मध्यमवर्गीयांसाठी दिलासादायक.

'राष्ट्र प्रथम' आणि जागतिक स्तरावर भारताचा सन्मान:

'राष्ट्र प्रथम' या भूमिकेतून सरकारने काम केले आहे.

  • ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करून भारताच्या शौर्याची प्रचिती जगाला दिली.
  • संरक्षण स्वदेशीकरण: आयात करत असलेली ५ हजार उपकरणे आता १००% भारतात बनतात आणि भारत ती निर्यात करतो.
  • २४ हजार कोटी रुपयांपर्यंत संरक्षण सामग्रीची खरेदी 'मेड इन इंडिया' मधून.
  • चांद्रयान ३ चे यश: जपानला जे जमले नाही ते भारताने करून दाखवले.
  • नक्षलविरोधी मोहीम वेगाने राबवून नक्षलवादाचे उच्चाटन करण्याच्या दिशेने सरकार वेगाने वाटचाल करत आहे.

आर्थिक प्रगती आणि आंतरराष्ट्रीय ओळख:

आर्थिक प्रगतीत भारताने मोठी झेप घेतली आहे. २०१४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात १० व्या क्रमांकावर होती, आज चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली असून, पुढच्या तीन वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर येण्याची अपेक्षा आहे. परकीय गुंतवणुकीत २६% वाढ झाली आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे भारत आत्मनिर्भर झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची दखल घेतली जात असून, पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांमुळे आणि सामाजिक-राजकीय संबंधांमुळे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मोठा मान-सन्मान मिळत आहे.

संस्कृती आणि अस्मितांचे जतन:

या काळात संस्कृती आणि अस्मिता जपण्याचे कार्यही चांगल्याप्रकारे झाले आहे. राम मंदिर निर्मिती आणि काशी विश्वनाथ कॉरिडॉर यांसारख्या उपक्रमांतून सांस्कृतिक पुनरुत्थानाला चालना मिळाली आहे. या सर्व कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशाचे श्रेय १४० कोटी भारतीयांना दिले आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या मंत्राने भारताने विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने भक्कम पाऊले टाकली आहेत, असे शत्रुघ्न काटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


विकासाला प्राधान्य देत मोदी सरकाऱचा भ्रष्टाचार, घोटाळे आणि तुष्टीकरणाला पूर्णविराम : शत्रुघ्न काटे विकासाला प्राधान्य देत मोदी सरकाऱचा भ्रष्टाचार, घोटाळे आणि तुष्टीकरणाला पूर्णविराम : शत्रुघ्न काटे Reviewed by ANN news network on ६/१४/२०२५ ०४:४९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".