‘गंगोत्री होम्स पर्यावरण दिन पुरस्कार २०२५’ सोहळा उत्साहात; प्रकाश जावडेकर यांचे पर्यावरणपूरक जीवनशैली टिकवण्याचे आवाहन
मेधा ताडपत्रीकर आणि अनिकेत लोहिया यांना ‘पृथ्वी’ व ‘जल’ पुरस्कार प्रदान
पुणे, दि. १५ जून २०२५: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘गंगोत्री होम्स’ संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेला ‘पर्यावरण दिन पुरस्कार २०२५’ सोहळा आज (रविवार), म. ए. सो. सभागृह (बाल शिक्षण मंदिर), मयूर कॉलनी, कोथरूड येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन व्यक्तींना ‘गंगोत्री होम्स पृथ्वी पुरस्कार’ आणि ‘गंगोत्री होम्स जल पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर होते. त्यांनी ‘पर्यावरण व विकास यांचा समतोल’ या विषयावर सखोल विचार मांडले. जावडेकर यांनी गंगोत्री होम्सच्या पर्यावरणपूरक कार्यपद्धतीचे कौतुक करत, पुरस्कार विजेत्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
पुरस्कार विजेते आणि त्यांचे कार्य:
- श्रीमती मेधा ताडपत्रीकर (रुद्र संस्था, पुणे): यांना ‘गंगोत्री होम्स पृथ्वी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ताडपत्रीकर यांनी प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधन निर्मितीचा अभिनव प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे. त्यांच्या कार्यातून पर्यावरण साक्षरता आणि पुनर्वापराचा आदर्श उभा राहिला आहे.
- अनिकेत लोहिया (मानवलोक संस्था, अंबेजोगाई): यांना ‘गंगोत्री होम्स जल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. लोहिया यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांत जलसंवर्धन आणि पाणलोट क्षेत्र विकासाचे प्रभावी कार्य केले आहे.
प्रकाश जावडेकर यांचे विचार:
प्रकाश जावडेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "पर्यावरण आणि विकास हे एकत्रच आहेत, त्यात द्वैत नाही." स्वच्छ भारत अभियानामुळे पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. कचरा व्यवस्थापन हे जनतेच्या सहभागातून व्हायला हवे यावर त्यांनी भर दिला. "पाणलोट क्षेत्र विकास कार्यात गंगोत्री आणि मी नव्वदच्या दशकात एकत्र काम केले आहे. तोच धागा पकडून मी या पुरस्कार सोहळ्याला आलो आहे," असेही ते म्हणाले.
जावडेकर यांनी हवामान बदलाच्या समस्येवरही प्रकाश टाकला. "कार्बन उत्सर्जन ही मूळ समस्या आहे, आणि भारत जगाच्या तुलनेत कमी कार्बन उत्सर्जन करतो. कार्बन इफिशियन्सीचे उद्दिष्ट भारताने गाठले असले तरी, हवामान बदलाचे दुष्परिणाम भारत सोसत आहे," असे त्यांनी सांगितले. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारत आघाडीवर असून, ही ऊर्जा साठवून ठेवण्याचे आव्हानही भारत पेलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपली जीवनशैली पर्यावरणपूरक असून, ती टिकवून ठेवली पाहिजे. देवराईसारख्या परंपरा आपल्याकडे आहेत, कारण जगात अशी जीवनशैली सापडणार नाही, असेही ते म्हणाले. पुण्यात पाण्याची परिस्थिती १५ वर्षांत बदलू शकते, आजच तीन हजार टँकर सोसायट्यांना लागतात, त्यामुळे पाण्याचे नियोजन आवश्यक आहे, असा इशाराही त्यांनी दिला. "प्लास्टिक ही समस्या नाही, तर वापरलेल्या प्लास्टिकचे संकलन आणि वर्गीकरण न होणे ही समस्या आहे," असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. इमारतींसाठी पर्यावरणाचे नियम आणखी कडक करण्याची आणि ग्रीन बिल्डिंग निर्मितीचे प्रमाण सध्याच्या ५-७ टक्क्यांवरून वाढवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
गंगोत्री होम्सची भूमिका:
‘गंगोत्री होम्स’चे संचालक राजेंद्र आवटे आणि गणेश जाधव यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचा आढावा घेतला आणि पर्यावरण पुरस्कार देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. पर्यावरणपूरक बांधकाम, नद्यांची स्वच्छता, वृक्षारोपण, जनजागृती, सायकल वाटप, पुनर्वापर प्रकल्प आदी उपक्रमांच्या माध्यमातून गंगोत्री होम्सने शाश्वत विकासाचा आदर्श घालून दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सुभाष देशपांडे, प्रा. विजय परांजपे, आनंद अवधानी, डॉ. पूर्वा केसकर, संतोष गोंधळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर ‘गंगोत्री होम्स’चे संचालक मकरंद केळकर यांनी आभार मानले.
Environment Day Award, Gangotri Homes, Prakash Javadekar, Medha Tadpatrikar, Aniket Lohia, Environmental Conservation, Green Building, Pune Event
#EnvironmentDay #Pune #GangotriHomes #PrakashJavadekar #EnvironmentalAwards #SustainableLiving #GreenBuilding #PuneEvents

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: