उरण: कोकण किनारपट्टीवर पावसाळी मासेमारी बंदी लागू असतानाही, उरण, रायगड आणि मुंबईच्या समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या पाच मच्छीमार बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली आहे. गेल्या सात दिवसांत या बोटी ताब्यात घेऊन काही बोटींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, एका बोटीकडून १ लाख ३० हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
या कारवाईत जय गौरी नंदन, एकवीरा माता, श्री जागृत गौराई, भवानी जगदंबा आणि देवाची आळंदी या पाच मच्छीमार बोटी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
खोल समुद्रातील मासेमारीसाठी १ ते ७ जून दरम्यान बंदीचे आदेश असतानाही, काही मच्छीमार नौका आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या मासेमारी करत असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. मनुष्यबळ अपुरे असतानाही मत्स्यव्यवसाय विभागाने बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. मात्र, या विभागाने सुरक्षा यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, देशाच्या सागरी सुरक्षेसाठी कोस्टगार्ड, केंद्रीय सुरक्षा बल आणि सागरी पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त गस्त घालून अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या बोटींची तपासणी करून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने, संयुक्त गस्ती पथक या कामात पुढाकार घेताना दिसत नाही. उलट, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी कारवाई करत नसल्याची ओरड करून त्यांना वेठीस धरले जात असल्याचा गंभीर आरोप मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
- --------------------------------------------------------------------------------------------------------
- Illegal Fishing, Monsoon Ban, Coastal Security, Fisheries Department, Uran, Raigad, Mumbai, Maharashtra
- #IllegalFishing, #MonsoonBan, #CoastalSecurity, #MaharashtraFisheries, #Uran, #Raigad, #Mumbai

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: