पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता, सर्प मित्रांचा इशारा
उरण, दि. ५ जून : उरण तालुक्यातील सारडे गावातील महादूबाई महादेव माळी (वय ७७) या महिलेचा सर्पदंशाने उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना बुधवारी (दि. ४) मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांनी, विशेषतः शेतकरी बांधवांनी सर्पदंशापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेने केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महादूबाई माळी बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घरी एकट्या होत्या. त्यावेळी वीज गेल्याने त्यांनी बॅटरी घेतली नव्हती. घराबाहेर पडताना त्यांना पायाला काहीतरी चावल्याचे जाणवले. सुरुवातीला त्यांना विंचू चावला असावा असे वाटले. मात्र, काही वेळाने मुले घरी आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्या मुलांनी तात्काळ उपचारासाठी त्यांना उरण येथील रुग्णालयात नेले, परंतु वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्य आणि सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विषारी साप चावल्यानेच या महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या उरणमध्ये पावसाळा सुरू झाल्यामुळे सापांच्या बिळात पाणी शिरते आणि ते भक्ष्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत येतात. त्यामुळे पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर, प्रत्येकाने, विशेषतः महिला, पुरुष आणि शेतकऱ्यांनी रात्री अपरात्री बाहेर पडताना बॅटरीचा वापर करणे आणि बूट घालणे आवश्यक आहे. एखाद्या अडगळीच्या ठिकाणी अनेक दिवसांपासून वस्तू ठेवल्या असतील, तर खात्री करूनच त्या बाहेर काढाव्यात. तसेच, अशा ठिकाणी काम करत असताना साप दबा धरून बसलेला नाही ना, याची खात्री करावी, कारण तो अचानक दंश करू शकतो.
वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा सर्पमित्र विवेक केणी यांनी नागरिकांना आपली काळजी घेण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सर्पदंश झाल्यास त्वरित शासकीय रुग्णालयात पोहोचण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी नम्रपणे सूचित केले आहे.
#Uran #Snakebite #MonsoonSafety #EnvironmentalAwareness #WildlifeConservation #Maharashtra #PublicSafety #FatalIncident

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: