पुणे, दि. ११ मे २०२५: महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'गांधी दर्शन' शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. कोथरूड येथील गांधी भवनात आज सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत हे शिबीर पार पडले. १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. अशोक राणा यांनी 'मिथक चिकित्सा' आणि लोकसंस्कृती अभ्यासक स्नेहा टोम्पे यांनी 'मातृत्वतत्त्वांची मिथके' या विषयांवर मार्गदर्शन केले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी होते. 'गांधी दर्शन' मालिकेतील हे विसावे शिबीर होते. प्रा. मच्छिन्द्र गोर्डे, अन्वर राजन, विकास लवांडे, अजय भारदे, स्वप्नील तोंडे, संदीप बर्वे, अरुणा तिवारी यांसारख्या मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकाच्या वाचनाने झाली.
प्रा. राणा यांनी सांगितले की, भारत पुराणकथांमध्ये रमणारा देश आहे, कारण लोकांना मिथक आणि वास्तवातील फरक समजत नाही. दैनंदिन जीवनातील घटनांना पुराणकथांशी जोडण्याची आणि त्यावर आधारित विचारसरणी स्वीकारण्याची भारतीयांची मानसिकता असते. मात्र, वास्तवाची दाहकता टाळण्यासाठी लोक कल्पनाविलासात रमतात. चमत्कारांनी भरलेली मिथके लोकांच्या मनावर राज्य करतात. त्यामुळे या कल्पनांच्या आवरणातून बाहेर पडून चिकित्सेसाठी तयार राहणे आवश्यक आहे.
स्नेहा टोम्पे यांनी सांगितले की, भविष्याची बीजे भूतकाळात दडलेली असतात. त्यामुळे पुराणकथा, मिथके आणि देवतांवर चर्चा करणे महत्त्वाचे आहे. पुरातत्वीय, राज्यशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून याकडे पाहण्याची गरज आहे. जगभरात प्रजननक्षमतेमुळे मातृदेवता निर्माण झाल्या आणि त्यांची पूजा सुरू झाली. योनीपूजा, वारूळ आणि कवडीची पूजा याचमुळे सुरू झाली. नाग आणि लिंगपूजा हा देखील याच परंपरेचा भाग आहे. कुंभ आणि घट हे गर्भाशयाचे प्रतीक मानले जातात, तर गुढी हे सृजनाचे प्रतीक आहे. मिथके ही घडलेल्या घटनांची स्पष्टीकरणे असतात आणि ती समजून घेताना तर्कशुद्ध विचार करणे आवश्यक आहे. तसेच, समता निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट्य असले पाहिजे.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले की, कथांमधून मिथके पुढे आणली जातात आणि त्याचे शास्त्र तयार झाले आहे. याचा तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे. वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि उच्च-नीच श्रेणी निर्माण करण्यासाठी मिथकांचा वापर केला जातो. साहित्य म्हणजे इतिहास नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. दंगे घडवण्यासाठी खोटी मिथके वापरली जातात आणि युद्धांमधील खरे-खोटे इतिहास दाखवले जातात. सत्य समजून घेण्यासाठी सामूहिक शहाणपण आणि विवेक असणे आवश्यक आहे.
-------------------------------------
#GandhiDarshan
#MythAnalysis
#RealityCheck
#PuneEvents
#Maharashtra
#ThoughtProvoking
Reviewed by ANN news network
on
५/११/२०२५ ०८:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: