पुणे, २६ मे - शहरात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. रविवारी कर्वेनगर परिसरात झाडाची फांदी डोक्यावर कोसळल्याने राहुल जोशी (वय ३०) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
राहुल जोशी सिंहगड रस्त्याच्या दिशेने दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक मोठ्या झाडाची फांदी त्यांच्या डोक्यावर कोसळली. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा तत्काळ मृत्यू झाला. जवळपासच्या नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावली, परंतु वैद्यकीय मदत पोहोचण्यापूर्वीच राहुल यांचा प्राण गेला होता.अलंकार पोलीस ठाण्याने या दुर्घटनेची नोंद घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की, झाड कुजलेले असल्याने जोरदार पावसामुळे फांदी तुटून पडली असावे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
महापालिकेचा निष्काळजीपणा; नागरिकांचा संताप अनावर
या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने झाडांची योग्य छाटणी न करणे, धोकादायक झाडे हटवण्यात हलगर्जीपणा करणे आणि नियमित देखभाल न करणे यामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा महापालिकेच्या निष्काळजीपणाचा बळी आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
यंदा मान्सूनने वेळेपूर्वीच महाराष्ट्रात दमदार एंट्री केली आहे. पुणे, मुंबई, कोकण आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा जोर सुरू आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबणे, वाहतूक कोंडी आणि झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
#PuneRains #TreeFallAccident #MunicipalNegligence #PuneWeather #UrbanSafety #Maharashtra #MonsoonAlert #InfrastructureSafety #CitizenRights #WeatherDisaster

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: