उरण - जागतिक स्तरावर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने तीन वर्षांनंतर पुन्हा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर उरण तालुका आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
आशिया खंडातील सिंगापूर, थायलंड, चीन आणि हाँगकाँग या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर भारतातही रुग्ण आढळू लागले आहेत. केरळमध्ये सर्वप्रथम कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आता या विषाणूने दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही पाय पसरले आहेत.
देशात कोरोनाचा 'जेएन-१' हा नवा प्रकार (व्हेरियंट) दाखल झाला आहे. मात्र भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हा नवीन प्रकार ओमायक्रॉनपेक्षा वेगळा नाही आणि नागरिकांनी घेतलेली लस यावर प्रभावी आहे, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.
उरण तालुका आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष आवाहन करत सांगितले आहे की, जर कोरोनाची लक्षणे दिसली तर तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून योग्य उपचार घ्यावेत. ताप, खोकला, श्वासोच्छवासात अडचण यांसारखी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये.
आरोग्य विभागाने मास्क वापरणे, हातांची स्वच्छता राखणे आणि सामाजिक अंतर पाळणे या मूलभूत नियमांचे पालन करण्याचेही आवाहन केले आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकाराविषयी अधिक माहिती मिळेपर्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
#HealthDepartment #CoronaIndia #MaharashtraHealth #HealthAlert #Coronavirus

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: