पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींसंदर्भात हिंदू महासंघाच्या पालक आघाडीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पालक आघाडीच्या प्रतिनिधींसह हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे, सौ. आदिती जोशी, सौ. तृप्ती तारे, नितीन शुक्ल, अजित जोशी, सौ. तृप्ती वाकडे, अश्विन वाकडे, कविता दोशी आणि आरती जोशी उपस्थित होते.
या बैठकीत ११ वीच्या प्रवेशाच्या नियमावलीत (जी.आर.) आवश्यक बदल करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पालक आघाडीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत ३ जून २०२५ पर्यंतच असल्याने, पालक आघाडी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेणार आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया सीईटीप्रमाणे सोपी असल्याचा दावा केला जात आहे, परंतु प्रत्यक्षात अनेक अडचणी येत आहेत. प्रवेश अर्जासाठी असलेले संकेतस्थळ वारंवार बिघडत आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेतील महाविद्यालयाचे नाव संकेतस्थळावर दिसत नाही. तसेच, विद्यार्थ्यांच्या घरांजवळ असलेली महाविद्यालये देखील संकेतस्थळावर उपलब्ध नाहीत. महाविद्यालयांमधील प्रशासकीय जागा शासनाने ताब्यात घेतल्यामुळे महाविद्यालयांकडे पुरेसे पर्याय उपलब्ध नाहीत. या सर्व समस्यांमुळे विद्यार्थी आणि पालक चिंताग्रस्त झाले असून तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. चांगले गुण असूनही चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल याची खात्री विद्यार्थ्यांना राहिलेली नाही.
हिंदू महासंघाने या प्रकरणी लक्ष घालून राज्यभरातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहण्याचा आणि न्यायासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
#11thAdmissions#Education #Maharashtra #Pune #Hindu_Mahasangh #Online_Process
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: