चिंचवड - चिंचवड मतदारसंघातील गंभीर पाणी टंचाई कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मुळशी धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी जाहीर केले आहे.
वाकड, पिंपळे सौदागर, सांगवी, पिंपळे गुरव आणि रहाटणी परिसरातील सोसायट्यांमधील रहिवाशांशी संवाद साधताना कलाटे यांनी सांगितले की, सध्या पवना धरणातून येणाऱ्या पाण्याला ३०-४० किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्याने गळतीसह अनेक कारणांमुळे पाणीपुरवठा अपुरा पडत आहे.
"फेब्रुवारी ते ऑगस्टपर्यंत तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. कोट्यवधी रुपये कर भरणाऱ्या नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. बोअरवेल्सचा आधार घ्यावा लागतो, परंतु उन्हाळ्यात त्याही आटतात," असे कलाटे यांनी नमूद केले.
न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. "टँकर लॉबी पोसण्याचे कटकारस्थान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे," असा गंभीर आरोप कलाटे यांनी केला.
"संधी मिळाल्यास येत्या दोन वर्षांत मुळशी धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणून चिंचवड मतदारसंघाला टँकरमुक्त करण्याचा माझा निर्धार आहे," अशी ग्वाही कलाटे यांनी दिली.
या कार्यक्रमास विविध सोसायट्यांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते. नागरिकांनी पाणी टंचाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी केली.
Reviewed by ANN news network
on
११/०५/२०२४ ०८:११:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: