क्यूनेट घोटाळा: ५० हजार कोटींची फसवणूक; भाजपचा आघाडी सरकारवर गंभीर आरोप
पुणे (प्रतिनिधी) - क्यूनेट कंपनीने देशभरात सुमारे ५० हजार कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा केला असून, महाराष्ट्रात साडेनऊ ते दहा लाख गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भंडारी यांनी आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले. "आघाडी सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील राहुल चिटणीस यांनी विशेष तपास पथक प्रमुखांना रिक्त जागा असलेला मसुदा पाठवून सह्या करण्यास सांगितले. मात्र, एसआयटी प्रमुख दिलीप देशमुख यांनी हे नाकारले, त्यानंतर सरकारने एसआयटी बरखास्त करून अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या," असा आरोप भंडारी यांनी केला.
क्यूनेट कंपनीच्या तीन मुख्य संचालकांपैकी एक श्रीलंकेतील रहिवासी असून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांशी त्याचा संबंध असल्याचाही दावा भंडारी यांनी केला. तसेच डॉ. झाकीर नाईक यांना परदेशात पळून जाण्यास क्यूनेट कंपनीने मदत केल्याचाही आरोप त्यांनी केला.
या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी राज्यपालांकडे मागणी करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
व्होट जिहाद मुद्द्यावरील शरद पवार यांच्या भूमिकेवरही भंडारी यांनी टीका केली. "धर्माच्या नावावर मते मागणाऱ्या पवार यांच्या पक्षाला धार्मिक राजकारण नसते, परंतु व्होट जिहादबाबत ते दुटप्पी भूमिका घेत आहेत," असा आरोप भंडारी यांनी केला.
Reviewed by ANN news network
on
११/१७/२०२४ ११:३७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: