वसुबारस दिनी शिवरायांच्या सागरी आरमाराचे स्मरण
पुणे (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड-किल्ल्यांपासून भारतीयांना प्रेरणा मिळू नये या उद्देशाने ब्रिटिशांनी त्यांना किल्ल्यांवर जाण्यास मज्जाव केला, परिणामी गडकोटांची दुरवस्था झाली, असे मत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात यांनी व्यक्त केले.
माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात दिवाळीनिमित्त आयोजित गड-किल्ले बांधणी स्पर्धेत ते बोलत होते. "छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोटांचे प्रशासन" या विषयावर त्यांनी विस्तृत माहिती दिली.
थोरात यांनी मराठी नौदलाच्या सामर्थ्याचा आढावा घेताना सांगितले की, एकावेळी ३०० लोकांची वाहतूक आणि ३०० टन साहित्य वाहून नेण्याची क्षमता असलेली जहाजे मराठ्यांकडे होती. या सागरी व्यापारामुळेच स्वराज्याची आर्थिक भरभराट झाली. शिवरायांच्या मृत्यूनंतरही मराठे लढू शकले, याचे श्रेय त्यांच्या उत्कृष्ट गडकोट प्रशासनाला जाते, असेही त्यांनी नमूद केले.
वसुबारस दिनाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या सागरी आरमाराच्या निर्मितीचे स्मरण करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील शिक्षिका व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांनी गाय आणि वासरांची पूजा केली. शाळा समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी गायींचे विविध प्रकार आणि त्यांचे उपयोग यांची माहिती दिली.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचे डॉ. सुशीलकुमार धनमने आणि अनंतप्रसाद देशपांडे यांनी परीक्षण केले. राजगड, प्रतापगड आणि तोरणा किल्ल्यांच्या प्रतिकृतींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास दिग्रसकर यांनी केले.
Reviewed by ANN news network
on
१०/२९/२०२४ ०१:०७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: