दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेवरील पूजेदरम्यान धमकी व विटंबनेचा आरोप
नवी दिल्ली/मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे मूळ गाव असलेल्या खेड तालुक्यातील मुंबके येथील त्याचा मालमत्तेचा लिलाव सरकारने केला. ही मालमत्ता दिल्ली येथील सुप्रीम कोर्टात वकिली करणारे भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी विकत घेतली असून त्यांना तेथे दाऊदधार्जिणे काही लोक त्रास देत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असून याच्या निषेधार्थ भारद्वाज यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणी भारद्वाज यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना एक पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, "मी २०१७ पासून दाऊद इब्राहिमच्या जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलावात नियमितपणे भाग घेत आहे. १० नोव्हेंबर २०२० रोजी मी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके येथील जमीन यशस्वीरित्या खरेदी केली. या जमिनीवर मी अनेकदा भेटी दिल्या, परंतु प्रत्येक वेळी मला अज्ञात व्यक्तींकडून धमक्या मिळाल्या."
त्यांनी पुढे सांगितले की, "२३ फेब्रुवारी २०२४ रोजी मी या जमिनीवर पूजा व होमहवन करण्यासाठी गेलो होतो. तेथे पोलीस बंदोबस्त होता. मात्र दाऊद अकबर दुदुके आणि अब्दुल्ला हुसेन अंतुले या दोन व्यक्तींनी माझ्या पूजेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आणि मला धमकावले. पोलिसांनी मात्र कोणतीही कारवाई केली नाही."
भारद्वाज यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते परत आले, तेव्हा त्यांना पूजास्थळाची विटंबना केल्याचे आढळले. "सर्व साहित्य नष्ट केले होते, तेथे मलमूत्र विसर्जन केले होते आणि प्राण्यांची हाडे पसरवली होती. पूजेचे साहित्य चोरीला गेले होते," असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
भारद्वाज यांनी या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही. ते आपल्या पत्रात म्हणतात, "पोलिसांनी हे प्रकरण 'ए सम्मरी'ने बंद केले आहे. हे अत्यंत वेदनादायक आहे की मी दाऊद इब्राहिमच्या दहशतवादाविरुद्ध लढत असताना, त्याचे समर्थक अजूनही आपल्या देशात प्रभाव गाजवत आहेत आणि पोलीस अप्रत्यक्षपणे त्यांना मदत करत आहेत," असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
भारद्वाज यांनी या प्रकरणाची सीबीआय किंवा तत्सम यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी असाही इशारा दिला आहे की जर १५ दिवसांत न्याय मिळाला नाही तर ते मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसतील.
या पत्राच्या प्रती त्यांनी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त यांनाही पाठवल्या आहेत.
या प्रकरणावर अद्याप पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, "आम्ही या पत्राची दखल घेतली आहे आणि प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल."
दरम्यान, या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली असून, प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: