पिंपरी :’निराकार प्रभूला साक्षी मानून सर्वांभूती प्रेमभावाचा अंगीकार करावा, ‘प्रेम’ केवळ शब्दांपर्यंत सीमित राहू नये, ते आपल्या जीवनात आणि व्यवहारात उतरावे. जरी प्रेम आणि आदर यांच्या बदल्यात प्रेम व आदर मिळत नसेल तरीही आपण आपले हृदय विशाल करुन सर्वांच्या प्रति प्रेमाचीच भावना धारण करावी.’ असे मार्गदर्शन निरंकारी मिशनच्या माता सुदीक्षाजी आपल्या अनुयायांना केले. नववर्षानिमित्त आयोजित केलेल्या विशेष व्हर्च्युअल सत्संगात त्या मार्गदर्शन करत होत्या. जगभरातील भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
सुदीक्षाजी म्हणाल्या, क्षणोक्षणी निराकार प्रभूला हृदयामध्ये धारण करुन आपण आपले हृदय इतके पवित्र करावे, की त्यातून केवळ प्रेम आणि प्रेमच उपजेल; वैर, ईर्षा, निंदा, द्वेष यांसारख्या नकारात्मक भावनांना त्यामध्ये स्थानच उरु नये.
त्यांनी पुढे सांगितले, की मागील दोन वर्षांतील परिस्थिती पाहिली तर कोरोनामुळे कित्येक लोकांच्या उद्योगव्यवसायांवर विपरित परिणाम झाला, शिवाय प्रत्यक्ष रूपात सत्संगाचे कार्यक्रमही बंद झाले. परंतु ज्ञानप्राप्तीनंतर प्रत्येक ब्रह्मज्ञानी संताला ही बाब अवगत झाली आहे, की त्याच्यासाठी प्रत्येक दिवस, महिना आणि वर्ष भक्तिमयच असतात. मग त्याच्या जीवनात एखादे वर्ष बदलण्याचे किंवा विशिष्ट दिवसाचे काही महत्व उरत नाही. ईश्वराची जाणीव ठेवून तो सदोदित आनंदाने जीवन व्यतीत करत असतो.
भक्तीपर्व समागम कार्यक्रम 16 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मिशनच्या वेबसाईटवर व्हर्च्युअल रूपात प्रसारित करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रातील 55वा प्रादेशिक निरंकारी संत समागम 11, 12 व 13 फेब्रुवारी व्हर्च्युअल रूपात होणार आहे.
’प्रभूला साक्षी मानून सर्वांभूती प्रेमभावाचा अंगीकार करावा’
Reviewed by ANN news network
on
१/०३/२०२२ १०:५८:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: