तात्काळ दुरुस्ती न झाल्यास निगडी टिळक चौकात 'रस्त्यावर झोपून आंदोलन' करण्याचा काळभोर यांचा इशारा
आयुक्त शेखर सिंह यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे बुजवावेत, नागरिकांची मागणी
पिंपरी, १० जुलै २०२५: पिंपरी ते निगडी दरम्यानच्या भक्ती-शक्ती मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असताना आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हा संपूर्ण रस्ता जीवघेणा बनला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या या प्रमुख रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे नजरेस पडत नाहीत आणि त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वाढली आहे. नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे 'जीव मुठीत धरून' प्रवास करण्यासारखे झाले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर दुर्लक्षाचा आरोप करत, “निगडी बीआरटी बसस्टॉप ते आकुर्डी खंडोबा माळ दरम्यानच्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी,” अशी मागणी ठणकावून केली आहे. काळभोर यांनी आयुक्तांनी तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून यावर उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
मेट्रो रेल्वेच्या कामामुळे या मार्गावर लोखंडी पत्र्यांचे कंपाऊंड करण्यात आले आहे, ज्यामुळे या ठिकाणी प्रचंड खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात योग्य देखभाल न झाल्याने या खड्ड्यांची समस्या अधिकच गंभीर झाली आहे.
नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याने, जर प्रशासनाने यावर तातडीने दखल घेऊन खड्डे बुजवले नाहीत, तर “निगडी टिळक चौक ह्या ठिकाणी रस्त्यावर झोपून आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा सचिन काळभोर यांनी दिला आहे. नागरिकांचा जीव धोक्यात न आणता वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे.
Reviewed by ANN news network
on
७/११/२०२५ १२:१७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: