'राजर्षी शाहू महाराज सन्मान योजने'तील लाभार्थी ५०० पर्यंत वाढवा, म्हाडाच्या घरांमध्ये १०% कलावंत कोट्याचीही विनंती
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निर्णय काढण्याचे आश्वासन; राज्यभरातील कलावंतांकडून आभार
मुंबई, ११ जुलै २०२५ (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिक आणि कलावंतांचा नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो. मात्र, अचानक शासकीय कामकाज किंवा राजकीय कार्यक्रम जाहीर झाल्यास अनेकदा याच दिवशी आयोजित नाट्यशो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले जातात. यामुळे कलावंतांचे मोठे आर्थिक नुकसान होते आणि प्रेक्षकवर्गही नाराज होतो. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत आमदार अमित गोरखे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणी करत शासनाने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी केली.
कलावंत या कार्यक्रमांच्या माध्यमातूनच आपला उदरनिर्वाह करतात, त्यामुळे कार्यक्रम रद्द होणे ही बाब त्यांच्यासाठी अत्यंत गंभीर आहे, असे आमदार गोरखे यांनी सभागृहात स्पष्ट केले.
या मुद्द्यावर राज्यभरातील अनेक कलावंतांनी आमदार गोरखे यांचे आभार मानले असून, त्यांनी यावेळी काही महत्त्वाच्या मागण्या देखील मांडल्या. या मागण्यांमध्ये:
'राजर्षी शाहू महाराज सन्मान योजना' अंतर्गत लाभार्थी कलाकारांची संख्या १०० वरून ५०० पर्यंत वाढवण्याची मागणी.
म्हाडाच्या घरांमध्ये कलाकारांसाठी असलेला २% कोटा वाढवून १०% करण्याची विनंती.
या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन योग्य तो निर्णय काढण्याचे आश्वासन आमदार अमित गोरखे यांनी दिले. कलाकारांचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडल्याबद्दल राज्यभरातील साहित्यिक, रंगकर्मी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी आमदार अमित गोरखे यांचे आभार मानले आहेत व त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: