सातारा, २७ जून २०२५: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील एक महत्त्वाचा विधी काल (गुरुवारी) नीरा नदीत संपन्न झाला. 'ज्ञानबा-तुकाराम' नामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात, पारंपरिक पद्धतीने माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. यावेळी उपस्थित हजारो वारकऱ्यांनीही नीरा नदीत स्नान करून वारीच्या आनंदाची अनुभूती घेतली.
स्नानानंतर, ज्ञानोबांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले.
नीरा नदीतील स्नानानंतर पालखीने लोणंद येथे प्रस्थान केले असून, आज (शुक्रवारी) पालखीचा मुक्काम लोणंदमध्येच असणार आहे. उद्या (शनिवारी) पालखी तरडगाव कडे मार्गस्थ होईल. याच मार्गावर चांदोबांचा लिंब येथे या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पार पडणार आहे, ज्यासाठी वारकरी आणि भाविक मोठ्या उत्साहात आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत आगमन
दरम्यान, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज बारामतीत भक्तीमय वातावरणात आगमन झाले. बारामती शहरातल्या विविध चौकांत पालखी रथ आणि दिंड्यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. आज पालखीचा मुक्काम बारामतीत असणार असून, उद्या (शनिवारी) काटेवाडी येथे मेढ्याचं रिंगण पार पडणार आहे.
या दोन्ही पालख्यांच्या सोहळ्यामुळे महाराष्ट्रातील भक्ती परंपरेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
Sant Dnyaneshwar Palkhi, Tukaram Maharaj Palkhi, Wari, Pandharpur Yatra, Neera River, Lonand, Baramati, Ringan Sohala, Maharashtra Pilgrimage
#PalkhiSohala #SantDnyaneshwar #SantTukaram #Wari #PandharpurYatra #NeeraRiver #Lonand #Baramati #Ringan #MaharashtraTradition #Bhakti

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: