पावसाळ्यापूर्वी रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य सेवा सुरळीत करण्याचे आदेश
मावळ, दि. ६ जून २०२५: मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा वेग वाढवण्याचे आणि कामांमध्ये समन्वय ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यासोबतच, त्यांच्या मूलभूत गरजांशी संबंधित रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य सेवांमध्ये कोणताही अडथळा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शुक्रवारी (दि. ६ जून) खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध शासकीय कामांच्या आढावा बैठक झाली. या बैठकीला प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ, तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, वन परीक्षेत्र अधिकारी समीर खेडेकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, महसूल, कृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण, वन, पाणीपुरवठा व स्वच्छता, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, पोलीस, बांधकाम, महसूल अभिलेख, जलसंपदा, सामाजिक न्याय, नगरपरिषद, निबंधक कार्यालय, पर्यटन, महावितरण, अंगणवाडी, रोजगार हमी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि इतर यंत्रणा व स्थानिक प्रशासन अशा एकूण ३२ विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे: खासदार श्रीरंग बारणे यांनी विकासकामांचा दर्जा, प्रलंबित कामे, अडथळे, उपलब्ध निधी आणि जनतेच्या तक्रारी यावर सखोल चर्चा केली. त्यांनी शासकीय यंत्रणांनी अधिक गतीने व समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत, वीजखांब आणि विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, तसेच कृषी क्षेत्रातील नुकसानीबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
आमदार महेंद्र थोरवे यांनी 'टीमवर्क'च्या माध्यमातून विकासाला गती देण्यावर भर दिला. स्थानिक समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जत तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधावा, असेही ते म्हणाले. अंगणवाड्यांना निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येबाबत विभागांनी लेखी स्वरूपात मागणी केल्यास शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वनमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार लाडिवली येथील डम्पिंग ग्राउंडच्या जागी वन उद्यान विकसित करण्यासाठी वन विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात पर्यटकांवर निर्बंध न आणता सुरक्षिततेच्या उपाययोजनांसह पर्यटन खुले ठेवण्याची भूमिका देखील आमदार थोरवे यांनी मांडली.
बैठकीत भूअभिलेख विभागाने मोजणीसाठी मनुष्यबळ अपुरे असल्याचे निदर्शनास आणले. अंगणवाडी विभागाच्या भारती साताळकर यांनी 'लेक लाडकी' योजनेत ४९९ पैकी ४७१ मुलींना पहिला हप्ता वितरित झाल्याची माहिती दिली, परंतु ४५ अंगणवाड्यांना अद्याप स्वतःची जागा उपलब्ध नसल्याचे सांगितले. शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी अनंत खैरे यांनी तालुक्यातील ३५५ शाळा १६ जूनपासून सुरू होणार असल्याचे सांगितले. तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी रेशनिंगसाठी तीन गोदामांत तीन महिन्यांचे धान्य साठवण्यात येत असल्याचे सांगितले. वन विभागाने पळसदरीतील दरडींमुळे संभाव्य धोका अधोरेखित केला असता, त्यावर पावसाळ्यापूर्वी कारवाईचे आदेश देण्यात आले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
#Maval #Karjat #Khalapur #DevelopmentWork #ShrirangBarne #MahendraThorve #GovernmentReview #Infrastructure #MonsoonPreparedness #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: