भिवंडीत दुहेरी हत्याकांडातील आरोपींना जन्मठेप; ५० हजार रुपये दंड
भिवंडी: भिवंडी तालुक्यातील २०१७ मधील दुहेरी हत्याकांडाप्रकरणी न्यायालयाने आरोपी रामआशिष पटेल आणि सागर कटाळे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मोक्का कोर्टात न्यायाधीश अमित एस. शेटे यांनी २६ मे २०२५ रोजी हा निकाल दिला. आरोपींनी एका पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा गुन्हा घडला होता.
भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक १७/२०१७ मध्ये आरोपींना भारतीय दंड संहिता कलम ३०२ (खून), ३०७ (खुनाचा प्रयत्न), ४६० (सशस्त्र डकैती) तसेच मोक्का कायदा कलम ३(१)अ, ३(१)(२), ३(३) अंतर्गत शिक्षा करण्यात आली आहे.
घटनेनुसार, आरोपींनी एका घरात अनधिकृतपणे प्रवेश करून पैशांची मागणी केली होती. पती-पत्नी झोपलेले असताना त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी पतीच्या पोटात चाकूने वार केले आणि पत्नीच्या डाव्या बाजूलाही हल्ला केला होता.
या गुन्ह्याचा प्राथमिक तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी केला. त्यांनी रामआशिष पटेल याला अटक केली. पुढे गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी दुसरा आरोपी सागर कटाळे याला अटक करून सबळ पुरावे गोळा केले.
न्यायालयात विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी एकूण १२ साक्षीदारांची तपासणी केली. पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉ. डी. एस. स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांनी साक्षीदारांना न्यायालयात हजर ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. पोलीस हवालदार विकास पाटील यांनी कोर्ट पैरवी केली.
न्यायालयाने आरोपींना भा.द.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि ५०,००० रुपये दंड; कलम ३०७ अन्वये १० वर्षे कैद आणि २०,००० रुपये दंड; तसेच कलम ४६० अन्वये जन्मठेप आणि १०,००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास अनुक्रमे २ वर्षे, १ वर्ष आणि २ वर्षे साधी कैद भोगावी लागेल.
या निकालामुळे २०१७ पासून प्रलंबित असलेल्या या गंभीर गुन्ह्याला न्याय मिळाल्याचे म्हटले जात आहे. तपास अधिकारी विशाल ठाकूर यांच्या कुशल तपासामुळे आरोपींना शिक्षा मिळवून देता आली.
#BhiwandiMurderCase #LifeImprisonment #JusticeDelivered #MCOCAVerdict #ThaneRural #CourtVerdict #CrimeNews #PoliceInvestigation #MurderConviction #LegalJustice #Maharashtra #BhiwandiNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: