पिंपरी: आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी पिंपरी-चिंचवडमध्ये अंतिम टप्प्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी (२७ मे) पालखी मार्गाची पाहणी केली.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी पिंपरी चिंचवडमध्ये आगमन होणार असून या दिवशी पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवडमध्ये २० जून रोजी आगमन होणार असून त्याच दिवशी पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या दोन्ही सोहळ्यांच्या स्वागत आणि नियोजनासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासन सूक्ष्म नियोजन करत आहे.
या पाहणी दौऱ्यात महापालिका शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता बापू गायकवाड, देवनना गट्टूवार, उपायुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सचिन पवार, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अधिकारी शिवराज वाडकर, संतोष दुर्गे, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर यांच्यासह पोलीस आणि महापालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह यांनी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. पालखी मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत आणि वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी योग्य सुविधा पुरवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------------------------------------------
#Maharashtra #PimpriChinchwad #AshadhiWari #Palkhi #Preparation #महाराष्ट्र #पिंपरीचिंचवड #आषाढीवारी #पालखी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: