ए एन एन न्यूज नेटवर्क
दिनांक २९ मे २०२५
आजचे बातमीपत्र
ठळक बातम्या
अंमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त, करोडोंचा मुद्देमाल जप्त
उरणमध्ये अतिवृष्टी; शेतकरी कामगार पक्षाची नुकसानग्रस्तांना तातडीने मदतीची मागणी
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींवरून हिंदू महासंघाचा आक्रमक पवित्रा
पुण्यात दोन गॅस स्फोटांत पाच जण जखमी, एकाच कुटुंबातील चार जण गंभीर
सांगवी परिसरात पावसाळी नुकसानीची आमदार जगताप यांनी केली पाहणी
दौंडमध्ये भिंत कोसळून मृत झालेल्या ताराबाई आहिर यांच्या वारसांना ४ लाखांची मदत मंजूर
आषाढी वारी यशस्वी करा; सर्व विभागांनी समन्वयाने काम करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'फर्ग्युसन'मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची धूम; ९० हून अधिक चित्रपटांची मेजवानी
आता पाहूया सविस्तर
बातम्या
मुंबई पोलिसांच्या परिमंडळ ६ च्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे एका अंमली पदार्थ उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २४ कोटी ४२ लाख ८० हजार रुपये किंमतीचे एमडी (मेफेड्रोन) आणि अंमली पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उत्पादन आणि विक्री करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिमंडळ ६ मध्ये जानेवारी २०२५ पासून "नशा मुक्त गोवंडी अभियान" राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने आतापर्यंत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात ७५ गुन्हे दाखल केले असून १८ कोटी ३१ लाख ९१ हजार ८७३ रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
उरण तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळवाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतकरी कामगार पक्षाने प्रशासनाकडे नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी केली आहे. नायब तहसीलदार महेश पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेश घरत, तालुका चिटणीस रवी घरत, विधानसभा अध्यक्ष रमाकांत पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींसंदर्भात हिंदू महासंघाच्या पालक आघाडीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पालक आघाडीच्या प्रतिनिधींसह हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे, सौ. आदिती जोशी, सौ. तृप्ती तारे, नितीन शुक्ल, अजित जोशी, सौ. तृप्ती वाकडे, अश्विन वाकडे, कविता दोशी आणि आरती जोशी उपस्थित होते. या बैठकीत ११ वीच्या प्रवेशाच्या नियमावलीत (जी.आर.) आवश्यक बदल करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पालक आघाडीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत ३ जून २०२५ पर्यंतच असल्याने, पालक आघाडी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेणार आहे
बुधवारी सकाळच्या सुमारास पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एलपीजी सिलेंडरचे स्फोट झाले, ज्यात एका जोडप्या आणि त्यांच्या दोन मुलांसह एकूण पाच जण जखमी झाले आहेत. या दोन्ही घटनांमध्ये गॅस गळतीमुळे आग लागून स्फोट झाले असून, एकाच कुटुंबातील चार सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. सर्वात गंभीर घटना वाडकरमळा येथे घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील चार सदस्य गॅस स्फोटात गंभीर जखमी झाले आहेत. या कुटुंबात ४८ वर्षीय पुरुष आणि त्यांची ४२ वर्षीय पत्नी यांच्या शरीराचा जवळपास ८० टक्के भाग भाजला आहे. त्यांची दोन मुले, १५ आणि १९ वर्षांची, देखील सुमारे ४० टक्के भाजली आहेत. दुसरी घटना औंध गावातील गुरुद्वाराजवळ एका घरात झाली आहे. येथे गॅस गळतीमुळे आग लागली आणि त्यात एक व्यक्ती जखमी झाली. या व्यक्तीला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी मंगळवारी सांगवी परिसरात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह
पिंपरी-चिंचवड परिसरातही अवकाळी पावसाने जोर धरल्यानंतर नागरिकांना भासणाऱ्या अडचणींवर त्वरित उपाय करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या व्यापक पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार जगताप यांनी जुनी व नवी सांगवी परिसरातील नाले, स्ट्रॉम वॉटर लाईन आणि रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याची स्थिती तपासली. पावसामुळे झालेली हानी, साचलेले पाणी, रस्त्यांवरील खड्डे आणि नाल्यांची स्थिती या सर्व मुद्द्यांवर त्यांनी प्रशासनाला कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आदेश दिले.
दौंड येथे २६ मे २०२५ रोजी पावसामुळे जुन्या बांधकामाची भिंत कोसळून जखमी झालेल्या श्रीमती ताराबाई विश्वचंद आहिर (वय ७५) यांचे उपचारादरम्यान निधन झाले होते. या दुर्घटनेतील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज त्यांच्या वारसांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. या मदतीचे प्रमाणपत्र दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते श्रीमती आहिर यांच्या वारसांना प्रदान करण्यात आले. पावसामुळे झालेल्या या दुर्दैवी घटनेत एका ज्येष्ठ महिलेचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आमदार राहुल कुल यांनी तातडीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
पंढरपूरची ‘आषाढी वारी’ ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असल्याने, सर्व मानाच्या पालख्या आणि वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा, फिरती शौचालये आणि पोलीस बंदोबस्ताचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अभिजित पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मानाच्या १० दिंड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. सावरकरांच्या क्रांतिकारी कार्याची साक्ष असलेली महाविद्यालयातील ऐतिहासिक खोली क्रमांक 17 नागरिकांसाठी आज खुली ठेवण्यात आली होती. विद्यार्थी असताना सावरकर यांचे वास्तव्य या खोलीत होते. या खोलीतूनच ‘अभिनव भारत’ सारख्या संघटनेची पायाभरणी, स्वदेशी चळवळीची सुरुवात, विदेशी वस्त्रांची होळी यांसारख्या क्रांतिकारी उपक्रमांची आखणी करण्यात आली होती.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’ येत्या २९ ते ३१ मे दरम्यान शहरात रंगणार आहे. या तीन दिवसीय महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल ९० चित्रपट, लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशन चित्रपट विनामूल्य दाखवले जाणार आहेत. आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह आणि चिंचवडमधील छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा फुले स्पर्धा परीक्षा केंद्र येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत चित्रपट रसिकांसाठी ही पर्वणी असणार आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. यासोबतच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य अमित गोरखे, उमा खापरे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, रोहित पवार, माजी आमदार विलास लांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बातमीपत्र संपले.
धन्यवाद!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: