पुणे: 'खजिन्याची शोधयात्रा' या पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास आणि संस्कृती प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. हे महत्त्वपूर्ण कार्य प्रशांत पोळ यांनी आपल्या व्यापक संशोधन आणि अभ्यासातून साकारले आहे. त्यामुळे, हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या पुस्तकातून ज्ञानाचा मोठा खजिना जनतेपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रशांत पोळ यांच्या 'खजिन्याची शोधयात्रा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मध्य प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह, मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशांत पोळ यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "आपला इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचे जतन करणे हे आपले परम कर्तव्य आहे. परकीय आक्रमकांनी आपल्या समाजाचे तेज आणि आत्माभिमान संपविल्यामुळेच आपण पारतंत्र्यात गेलो. भारत एक समृद्ध देश होता आणि आक्रमकांनी आपल्या संपत्तीची लूट केली. आपले ज्ञान आणि संस्कृती ही आपली खरी शक्ती आहे हे लक्षात घेऊन ज्ञानकेंद्रे उद्ध्वस्त करणे, सांस्कृतिक प्रतीके जमीनदोस्त करणे आणि आपल्यावर त्यांची संस्कृती थोपवणे हे काम सातशे वर्षांहून अधिक काळ चालले. याच कारणामुळे आपल्या पिढ्यांना आपल्या इतिहासाची माहिती राहिली नाही आणि भारत पारतंत्र्यात गेला."
वेगवेगळ्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून आपली संस्कृती केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात पोहोचली होती, असा निष्कर्ष निघाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जगातील अनेक प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या असताना, भारत ही एकमेव संस्कृती आहे जी पूर्वीपासून अस्तित्वात आहे आणि आजही जिवंत आहे. प्रशांत पोळ यांनी पुस्तकात ढोलावीरा आणि लोथल यांसारख्या प्राचीन शहरांविषयी माहिती दिली आहे. त्यातून आजच्या स्थापत्यशास्त्रामध्ये अपेक्षित असलेल्या अनेक गोष्टी सहा हजार वर्षांपूर्वीही आपल्याकडे होत्या, हे दिसून येते.
ते पुढे म्हणाले, "युरोपीय देशांमध्ये जेव्हा संस्कृतीची संकल्पना स्पष्ट नव्हती, तेव्हा आपली संस्कृती विकसित अवस्थेत होती. संस्कृतसारखी प्रगत भाषा आपल्याला ज्ञात होती. भारताचा हा ज्ञानाचा खजिना खूप जुना आहे. ही केवळ सिंधू संस्कृती नाही, तर सरस्वती संस्कृतीदेखील आहे. भौतिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या ही संस्कृती अत्यंत संपन्न होती. पहिल्या शतकात जगाच्या व्यापारामध्ये भारताचा वाटा ३३ टक्के होता. आपल्या या समृद्ध इतिहासाची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. देशाचा हा इतिहास, आपले वैभव आणि गणितातील भारताची प्रगती या पुस्तकातून मांडली आहे."
देशात हिंदवी स्वराज्य आणि मराठा साम्राज्याची स्थापना झाली, हे ज्ञान आपल्याला व्यवस्थितपणे शिकवले गेले नाही. त्यामुळे आपली संस्कृती आणि ज्ञान आपल्याला माहीत असले पाहिजे आणि ते पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आयुर्वेदातील प्राचीन ग्रंथांवरही अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे. हे पुस्तक सर्वांना योग्य मार्गदर्शन करेल आणि ज्ञानाची ही शोधयात्रा अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, "भारताला पुन्हा एकदा जगद्गुरूच्या पदावर पोहोचवण्यासाठी भारतीय ज्ञानपरंपरेची माहिती, जाणीव आणि महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. म्हणूनच नव्या शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानाच्या परंपरेचा समावेश करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रशांत पोळ यांच्या पुस्तकात प्राचीन काळातील भारताच्या व्यापारी वैभवाचे उत्कृष्ट वर्णन आहे. या पुस्तकातून अनेक नवीन आणि महत्त्वपूर्ण बाबी समोर येतात."
मध्य प्रदेशचे मंत्री राकेश सिंह यांनी सांगितले की, "भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन होत असताना, लेखणीच्या माध्यमातून देशाचा खरा इतिहास नागरिकांसमोर येत आहे. हे पुस्तक भारताला समजून घेण्यासाठी आणि देशाच्या सांस्कृतिक वैभवाचे स्मरण करण्यासाठी दिलेली एक महत्त्वपूर्ण हाक आहे. प्रशांत पोळ यांच्यासारख्या लेखकांमुळेच आपण देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा अनुभव घेऊ शकतो. त्यांच्या लेखनात प्रामाणिकपणा आणि भारताच्या संस्कृतीबद्दलची निष्ठा स्पष्टपणे जाणवते." हे पुस्तक देशातील सर्व भाषांमध्ये प्रकाशित होऊन देशभरात पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. गो. बं. देगलूरकर म्हणाले, "भारतीय संस्कृती ही जगातील पहिली आणि समाजानुसार बदलणारी संस्कृती आहे. आपली संस्कृती नेहमी प्रवाही राहिली आहे. वेद, उपनिषदे आणि भगवतगीतेतील अमूल्य ज्ञान आपण जगासमोर ठेवले आहे. आपल्या विचारांची श्रीमंती आपल्या लक्षात येत नाही. भारतीय संस्कृती, ज्ञानोपासना आणि विचारांकडे बारकाईने पाहिल्यास हा ज्ञानाचा मोठा खजिना जनतेसमोर आणण्याची गरज आहे. असे प्राचीन भारतीय ज्ञान समाजात पोहोचल्यास देशाचा निश्चितच विकास होईल."
प्रशांत पोळ यांनी सांगितले की, २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'भारतीय ज्ञानाचा खजिना' या पुस्तकाला शासकीय वाचनालयांमध्ये वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. भारतीय विचारवंत अनेक ज्ञानशाखांमध्ये जगामध्ये खूप पुढे होते. दुर्दैवाने, जगात ज्या परदेशी संशोधकांच्या नावावर अनेक शोधांचे जनक म्हणून ओळख आहे, ते अनेक शोध त्यापूर्वीच भारतात लागले होते. मात्र, ही माहिती आपल्याला पुढे सांगितली गेली नाही. जगाचे विश्वगुरू होण्यासाठी प्रयत्न करत असताना, आपल्याला आपल्या समृद्ध संस्कृतीची आणि ज्ञानपरंपरेची माहिती आणि अभिमान असणे अत्यंत आवश्यक आहे.
या कार्यक्रमात राजेश पांडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. 'खजिन्याच्या शोधात' हे पुस्तक देशाच्या महान वैभवावर आधारित आहे. पुणे हे पुस्तकप्रेमींचे शहर असल्यामुळे या पुस्तकालाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
#KhajinyachiShodhyatra #PrashantPol #DevendraFadnavis #IndianHistory #IndianCulture #MarathiNews #Pune #BookLaunch #AncientIndia #BharatiyaGyanParampara

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: