नांदेड, दि. २६: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेडमधील शंखनाद सभेत बोलताना, मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण देश नक्षलवादमुक्त करण्याची ग्वाही दिली. 'ऑपरेशन सिंदूर' कारवाईतून भारताने जगाला आपली ताकद दाखवून दिली असून, भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना धूळ चारण्याचा इशारा दिला होता. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून शेकडो दहशतवाद्यांना ठार केले. "गोली का जवाब गोले से दिया जायेगा" हा संदेश देत, भारतीय सैन्याने २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले, पण भारतीय सुरक्षा यंत्रणेने ते हवेतच नष्ट केले. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणाली आणि हवाई तळांवर हल्ले करून त्यांची वाताहत केली. "आमच्या माताभगिनींच्या कपाळावरचे सिंदूर स्वस्त नाही," याची जाणीव जगाला करून दिली, असे शहा म्हणाले.
"हा नवा भारत आहे, विकसित आणि बलवान भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही," असे शहा यांनी सांगितले. "रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, व्यापार आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही," असे मोदींनी बजावले आहे. यापुढे आगळीक केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांवर टीका करताना शहा म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईबद्दल मोदीजींना मिठी मारली असती." फडणवीस सरकारने मराठवाड्यातील पाणी योजनांना गती दिली असून, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम मोदींनी केले, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, अशोक चव्हाण आदी नेत्यांनीही सभेत भाषणे केली. "ऑपरेशन सिंदूर कारवाईतून भारताने जगाला आपली ताकद दाखवली," असे फडणवीस म्हणाले, तर "संपूर्ण भारत मोदी आणि भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी सरकारसोबत उभा आहे," असे चव्हाण यांनी सांगितले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AmitShah #NaxalFreeIndia #OperationSindoor #PakistanTerrorism #MaharashtraPolitics #Nanded #Development #MarathiLanguage #ModiGovernment #IndianArmy

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: