नवी मुंबई: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाल्यांची साफसफाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. शिवसेना महानगर संघटक मंगेश रानवडे यांनी २६ मे रोजी सेक्टर ३० आणि ३५ ला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या भागात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असून, पावसाचा जोर वाढल्यास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सेक्टर ३० आणि ३५ मध्ये तळोजा जेलजवळ एक मोठा तलाव आहे. या तलावात डोंगराचे पाणी आणि सेक्टर ३० ते ३६ मधील पाणी जमा होते. हे पाणी तळोजा गावानजीकच्या खाडीत जाते. मात्र, विविध सेक्टरमधून नाल्यांमार्फत येणारे पाणी वाहून नेणारे नाले पूर्णपणे साफ केलेले नाहीत. तसेच, तलावाच्या सभोवतालची वाढलेली झाडेझुडपे आणि कचरा हटवण्याची कोणतीही कारवाई झालेली नाही, असे रानवडे यांनी निदर्शनास आणले.
या भागात पावसाचे पाणी साचल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. महापालिकेने तातडीने नाल्यांची साफसफाई करावी आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#NaviMumbai #Monsoon #Drains #Cleanliness #ShivSena #Mangeshranawade #Taloja

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: