पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी, दि. ३१ मे २०२५: आज, शनिवार, दि. ३१ मे २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोरवाडी चौक, पिंपरी येथील अहिल्यादेवींच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे शहराध्यक्ष श्री. योगेश बहल तसेच शहरातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, "ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे पुरुषांमधले उत्तम राजे होते, तसेच अहिल्यादेवी या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या होत्या. आपल्याला त्यांच्या बुद्धीमत्तेचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून त्यांनी शेतकऱ्यांच्या जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या. शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून प्रजेला गाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले. अहिल्यादेवी या एक महान राज्यकर्त्या स्त्री होत्या. अहिल्यादेवी होळकर या एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या."
बहल पुढे म्हणाले, "पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने त्यांना विरोध केला होता, त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यांना सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू राहावी म्हणून त्याकाळात यशस्वी प्रयत्न केले. माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या. त्यामध्ये अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादीमध्ये काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, द्वारका, बद्रीकेदार अशी अनेक मंदिरे आहेत. इंदूरमधील त्यांचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. या काळात कायद्याचे राज्य होते. आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकाळात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला, अशा या महान मातेस मानाचा त्रिवार मुजरा करतो. अहिल्यादेवींच्या साधेपणाने, धर्मनिष्ठेने आणि राष्ट्रीय स्वाभिमानाने प्रेरित होऊन आपण सर्वांनी जनसेवेचा वसा अधिक दृढ करूया. त्यांच्या त्रिशताब्दी (३०० व्या) जयंतीनिमित्त आपल्या संपूर्ण शहरवासियांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देतो."
यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, मा. सभापती विजय लोखंडे, मा. नगरसेवक मायला खत्री, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, सामाजिक न्याय महिला अध्यक्षा गंगा धेंडे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, वरिष्ठ महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, उद्योग व व्यापर सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी, महिला कार्याध्यक्षा उज्वला ढोरे, उपाध्यक्ष संपतराव पाचुंदकर, गोरोबा गुजर, प्रदीप गायकवाड, देवी थोरात, रविंद्र सोनवणे, शहर महिला उपाध्यक्षा भाग्यश्री म्हस्के, महेश शिरूडे, धनाजी तांबे, सुनिल आडागळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
------------------------------------------------------------------------------------------------------------- #AhilyadeviHolkar #PimpriChinchwad #NCP #Maharashtra #BirthAnniversary #SocialReform

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: