"लाडकी बहीण योजनेतून महिलांचे सक्षमीकरण" - आमदार अश्विनी जगताप
पिंपळे गुरव, चिंचवड (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या 'लाडकी बहीण योजने'मुळे राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत असल्याचे मत आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ पिंपळे गुरव येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
"महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महायुती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत. उज्ज्वला योजनेमुळे गरीब महिलांच्या आरोग्याचे संरक्षण झाले आहे. सुकन्या समृद्धी योजनेतून मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक मदत मिळत आहे," असे जगताप यांनी सांगितले.
महिला बचत गटांना प्रोत्साहन, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, मिशन इंद्रधनुष, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आणि प्रधानमंत्री जनधन योजनेद्वारे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या मेळाव्यास माजी महापौर शकुंतला धराडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, शशिकांत कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे पिंपळे गुरव परिसरातील साडेपाच हजारांहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असून, त्यांनी शंकर जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
"महायुती सरकार महिलांच्या पाठीशी भक्कम उभे असून, चिंचवडमधील बहिणींच्या हितासाठी शंकरभाऊ जगताप कटिबद्ध आहेत," असे आवाहन अश्विनी जगताप यांनी केले.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०४:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: