पुणे - महापुरुषांमध्ये द्वंद्व निर्माण करण्याचे प्रयत्न चुकीचे असून, गांधी विरुद्ध आंबेडकर, गांधी विरुद्ध नेताजी अशा लढाया लावण्यात अर्थ नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विश्वकोश महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी केले.
महराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने कोथरूड येथील गांधी भवनमध्ये आयोजित 'गांधी दर्शन' शिबिरात ते बोलत होते. या पंधराव्या शिबिराला विद्यार्थी आणि तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रा. दीक्षित म्हणाले, "गांधीजींची अहिंसा ही नेभळटांची नव्हे तर सबलांची होती. त्यांचे तत्त्वज्ञान हे केवळ सांगण्या-बोलण्याचे नसून कृतीचे होते." सध्याच्या राजकारणाची भाषा आणि संस्कृती रसातळाला गेल्याचे नमूद करत त्यांनी गांधी विचारांच्या आचरणाची गरज व्यक्त केली.
डॉ. कुमार सप्तर्षी यांनी गांधीजींच्या पर्यावरणविषयक दृष्टिकोनाचा उल्लेख करत भौतिक प्रगतीच्या पाश्चात्य कल्पनेला गांधींनी घातलेल्या मर्यादांचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमात डॉ. सदानंद मोरे यांनीही मार्गदर्शन केले. युवक क्रांती दलाचे शहराध्यक्ष सचिन पांडुळे यांनी स्वागत केले तर अॅड. स्वप्नील तोंडे यांनी सूत्रसंचालन केले.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०४:००:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: