वाकड (प्रतिनिधी): गेल्या दहा वर्षांत गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असूनही आयटीयन्स आणि स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यात अपयश आल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद बैठकीत त्या बोलत होत्या.
हिंजवडीतील नोकरदारांना नऊ तासांच्या कामासाठी पाच तास वाहतुकीत घालवावे लागत असल्याचे, तसेच मेट्रो कनेक्टिव्हिटी, पाणीपुरवठा, वीज पुरवठा यांसारख्या समस्यांचे गाऱ्हाणे आयटीयन्सनी मांडले. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी वार्षिक २० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.
सुळे यांनी जलजीवन मिशनमध्ये झालेल्या "हजारो कोटींच्या चुराड्याची" श्वेतपत्रिका मागणार असल्याचे जाहीर केले. मूलभूत सुविधांऐवजी 'बिग टिकेट' प्रकल्पांना प्राधान्य देऊन भाजपने उधळपट्टी केल्याचा आरोप त्यांनी केला.
कार्यक्रमात राहुल कलाटे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, महिला प्रदेश अध्यक्षा स्वाती चिटणीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ ०९:५३:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: