"महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला पाठिंबा द्या" - स्मृती इराणी
मुंबई (वृत्तसंस्था) - महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षांत केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या कार्यकाळात विकासाची नवी उंची गाठली असून विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीला आशीर्वाद देण्याचे आवाहन माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले.
भाजपा मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्रीमती इराणी म्हणाल्या, "एकीकडे विकासाला गती देणारी महायुती, तर दुसरीकडे 'मतासाठी झूट, सत्तेत लूट आणि जनतेत फूट' अशी नीती असलेली महाविकास आघाडी आहे."
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अन्य राज्यातील काँग्रेस नेते महाराष्ट्रात खोटारडेपणाचे मायाजाल पसरवत असल्याचा आरोप करताना त्यांनी कर्नाटक, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांची उदाहरणे दिली. कर्नाटकमध्ये काँग्रेसने आदिवासी आणि दलित समाजाच्या प्रगतीसाठी असलेला सुमारे दहा हजार कोटींचा निधी इतरत्र वळवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
"राजस्थानात बेरोजगार भत्त्याचे आश्वासन देऊनही ना रोजगार मिळाला ना भत्ता. हिमाचलमध्ये वीज बिल कमी करण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात बिले वाढवली. महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचे आश्वासन देऊन ९६ टक्के महिलांना वंचित ठेवले," असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या आश्वासनांचे पोकळपण उघड केले.
मोदी सरकारने सर्वांसाठी जनकल्याणाच्या योजना राबवल्या असून सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकासाचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जातीजातींमध्ये फूट पाडणाऱ्या विरोधकांना मतदार त्यांची जागा दाखवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला, डॉ. सय्यद जफर इस्लाम, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान, देवांग दवे आदी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०५:४३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: