उरण : उरणमध्ये अनेक महिने एनएमएमटी (नवी मुंबई महानगरपालिका परिवहन) बस सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार आणि आबालवृद्ध यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे, ज्यामुळे प्रवासी भाड्यात वाढ झाली आहे. खाजगी वाहने महाग असल्याने नागरिकांची आर्थिक लूट होत आहे, तसेच प्रवासाचा वेळ आणि श्रम देखील अधिक लागत आहेत. यामुळे लोकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी व घरी परतण्यासाठी वेळेत विलंब होत आहे.
या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी उरण शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मॉर्निंग कट्टाचे कार्यकर्ते आणि उरणमधील जेष्ठ नागरिकांनी एकत्र येत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी उरणमध्ये लवकरात लवकर एनएमएमटी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आणि निवेदन सादर केले. या निवेदनावर उरणमधील ३०० हून अधिक नागरिकांच्या सह्याही घेतल्या गेल्या, ज्याने या मागणीला व्यापक पाठिंबा मिळाला आहे.
आयुक्त कैलास शिंदे यांनी प्रवाशांच्या समस्यांची दखल घेत लवकरच उरणमध्ये एनएमएमटी बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर करताना काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, अभय वेद पाठक, माजी नगरसेविका आफशा मुकारी, अकबर नदाफ, चंदा मेवती, मोहनसिंग खरवड आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: