पुणे : रतन टाटा यांच्या स्मरणार्थ वारजे येथील स्मृती वनात वृक्षारोपण करण्यात आले. तेर पॉलिसी सेंटर आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
रविवारी सकाळी ९ वाजता वारजे नागरी वन (गणपती माथा) येथे हा कार्यक्रम पार पडला. या प्रकल्पात राज्य वन विभाग आणि टाटा मोटर्स यांचेही सहकार्य लाभले आहे.
तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ. विनिता आपटे यांनी स्वागत करताना या प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "वारजे नागरी उद्यान व स्मृतीवन या प्रकल्पाची सुरुवात २०१६ साली झाली. त्यावेळी टाटा मोटर्सच्या साहाय्याने तेर पॉलिसी सेंटरने ४००० देशी वृक्ष लावले."
डॉ. आपटे यांनी पुढे म्हटले, "तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या प्रकल्पाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. त्यानंतर पुढील दोन वर्षांत आम्ही टाटा व इतर संस्थांच्या मदतीने १०,००० पेक्षा जास्त देशी वृक्ष इथे लावले."
आजच्या कार्यक्रमात रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नारळ आणि सोनचाफ्याचे झाड प्रतीकात्मकरित्या लावण्यात आले. डॉ. आपटे यांनी या प्रकल्पाच्या यशाचे श्रेय टाटा मोटर्स आणि प्रकाश जावडेकर यांना दिले.
वारजे टेकडी नागरी वन प्रकल्पाबद्दल बोलताना डॉ. आपटे म्हणाल्या, "२०१५ साली केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निर्देशानुसार वारजेला एक 'हरितस्थळ' म्हणून रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारी-खासगी भागीदारीतून हे 'स्मृतीवन' अस्तित्वात आले."
२०१५ ते २०२२ या काळात साडेसात हजार झाडे लावली गेली, जी आता २० ते २५ फूट उंच वाढली आहेत. सध्या ही संख्या १० हजारांपर्यंत पोहोचली आहे. अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतीप्रीत्यर्थ झाडे लावून ती दत्तक घेतली आहेत.
या कार्यक्रमाला तेर पॉलिसी सेंटरचे सर्व प्रतिनिधी, तसेच राजाभाऊ बराटे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
१०/१३/२०२४ ०१:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: