पुणे: पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणी पातळी वाढल्याने आज सकाळपासून धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून 9,416 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा खडकवासला पाटबंधारे विभागाने दिला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगड आणि सातारा जिल्ह्यांमध्ये विशेषत: अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सोमवारी रात्रीपासून पुणे शहरात पाऊस सुरू आहे आणि तो मंगळवारी रात्रीपर्यंत कायम होता. यामुळे काही प्रमाणात जनजीवनावर परिणाम झाला आहे. शिवाजीनगर भागात १५.५ मिमी आणि चिंचवडमध्ये ३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील २४ तासांतील पावसाचे आकडे: लोणावळा १३४ मिमी, लवासा १३४ मिमी, निमगिरी ५८ मिमी, चिंचवड ३९.५ मिमी, माळीण ३४.५ मिमी, खेड २५.५ मिमी, तळेगाव २३ मिमी, एनडीए २१ मिमी, राजगुरुनगर १७ मिमी, वडगाव शेरी १४ मिमी, दापोडी १३.५ मिमी, पाषाण १२.२ मिमी, शिवाजीनगर १५ मिमी, तळेगाव ढमढेरे ७ मिमी, हडपसर ६.५ मिमी.
धरणाच्या पाणी पातळीमुळे पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाने केले आहे.
Reviewed by ANN news network
on
७/२४/२०२४ १२:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: