समाज कल्याण विभाग आणि बार्टीला निवेदन सादर
पुणे : पुण्यातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात तृतीयपंथी विद्यार्थ्याला प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप रयत विद्यार्थी विचार मंच या संस्थेने केला असून या प्रकरणी १० दिवसात योग्य ती कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणार्या शुभम भास्कर गुडधे हा तृतीयपंथी विद्यार्थी स्वतःसह आपल्या सहकार्याला वसतिगृहात प्रवेश मिळावा यासाठी गेले अनेक दिवस प्रयत्न करत आहे. यासंदर्भात कल्याण विभाग आणि बार्टी कार्यालयाशी पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.
या प्रकरणी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी आयुक्त, समाजकल्याण विभाग आणि महासंचालक बार्टी यांना मेलद्वारे निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,जर पुढील १० दिवसांत याबाबत लेखी उत्तर मिळाले नाही, तर संस्थेचे पदाधिकारी आणि तृतीयपंथी समुदायाचे सदस्य कार्यालयासमोर उपोषणाला बसतील.
शिक्षणाच्या माध्यमातून तृतीयपंथी समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजातील दूषित मानसिकता बदलण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. त्यामुळे या मागणीला समाजात सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
Reviewed by ANN news network
on
७/०७/२०२४ ११:५७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: