शासनाच्या हलगर्जीमुळे शेतजमिनी नापिक; २५० एकर क्षेत्र,१०० हून अधिक कुटुंबे बाधित
विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे चाणजे येथे सुमारे २५० एकर जमिनीवर खारफुटीचे अतिक्रमण झाले आहे. शिवाय शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीचा इतिहास न पाहता सी.आर.झेड मध्ये दाखविल्याने स्वतःच्या मालकीची शेती असून सुद्धा शेतकरी (मालक )ही जमीन कोणाला विकू शकत नाहीत. तसेच या क्षेत्रात कोणतेही पिक घेऊ शकत नाहीत.शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या समस्येकडे लोकप्रतिनिधीसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच महाराष्ट्र शासनाने नेहमी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून श्री हनुमान मंदिर, कोंढरीपाडा, करंजा, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत चाणजे शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्या न सुटल्याने येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर एकमताने बहिष्कार टाकून निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.या समस्याची दखल घेत उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांनी सदर शेतकऱ्यांना बैठकीला बोलाविले होते. २२ मार्च रोजी झालेल्या बैठकीत मात्र कोणतेही प्रत्यक्ष कृती न करता प्रशासनातर्फे केवळ आश्वासन देण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणे हाच एकच पर्याय उरला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
५० ते ६० वर्षापूर्वी मौजे चाणजे खाडीतील शेतजमिनीवर मोठ्या प्रमाणात भातशेती केली जात होती, परंतु कालांतराने समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतीत येऊ लागले परिणामी येथील शेतजमिनीत खारफुटी वाढत गेली. शेतजमिनीचा इतिहास न पाहता आत्ताच्या परिस्थितीचा विचार करून सरकारी यंत्रणेकडून पिकती भातशेतीची जमीन सी.आर.झेड. व खारफुटीत दाखवण्यात आली आहे. परिणामी ७/१२ उताऱ्यावर शेतकऱ्यांची नावे (भातशेती पीक) असलेली शेतजमीन "ना पिकवू शकत, ना विकू शकत" अशी शून्य मोल झाली आहे.आजतागायत येथील शेतजमीनीचे अस्तित्व टिकवण्यासाठी व शेतकऱ्यांना एवढ्या गंभीर समस्येतून न्याय देण्यासाठी येथील पुढारी,नेत्यांनी विधानसभा,विधानपरिषद सभागृहात किंवा इतर योग्य ठिकाणी हा गंभीर प्रश्न,समस्या उपस्थित केला नाही. त्यामुळे या विषयाच्या अनुषंगाने जोपर्यंत येथील बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या लोकसभा,विधानसभा निवडणुकीवर मौजे चाणजे येथील बाधित शेतकऱ्यांद्वारे बहिष्कार टाकण्याचे ठरले आहे.या संदर्भात अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की रविवार दिनांक १७ मार्च रोजी सायंकाळी ६:०० वाजता "हनुमान मंदिर कोंढरीपाडा" येथे सभा आयोजित केली होती.शेतकऱ्यांनी आपले विचार मांडून येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा एकमुखी निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रशासनाने बैठकीला बोलाविले.प्रशासनासोबत बैठक झाली.मात्र कोणतेही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला .
या संदर्भात विविध बैठका घेउन, शासनाला पत्रव्यवहार करून चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे, सेक्रेटरी निशिकांत म्हात्रे, खजिनदार नितीन म्हात्रे, परशुराम थळी, कृष्णा पाटील, रुपेश म्हात्रे,सुरेश थवई, धर्मेंद्र ठाकूर, अनिकेत ठाकूर, गणेश म्हात्रे, चैतन्य थळी,मंगेश म्हात्रे आणि इतर शेतकरी बांधवांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे. शेतकरी प्रतिनिधी व तहसीलदार व इतर अधिकारी यांच्यात या विषयावर चर्चा झाली मात्र कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
चाणजे ग्रामस्थांचा लोकसभा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार
Reviewed by ANN news network
on
५/१०/२०२४ ०८:०२:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/१०/२०२४ ०८:०२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: