पुणे : कमी वेळेत अधिक पाऊस होऊन शहरात निर्माण होणारी पूरस्थिती रोखण्यासाठी शहरी पूर नियंत्रण आराखडा राबविणार असल्याचे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
दत्तवाडी, राजेंद्र नगर, सेनादत्त पोलीस चौकी, नवी पेठ, टिळक रस्ता, रामबाग कॉलनी, साने गुरुजी नगर, पर्वती गाव, लक्ष्मीनगर, सातारा रस्ता परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने, सरस्वती शेंडगे, राजेंद्र काकडे, अमित कंक, प्रशांत सुर्वे, प्रणव गंजीवाले, चंद्रकांत पोटे, संजय देशमुख, छगन बुलाखे, राजू परदेशी, उमेश चव्हाण, राजाभाऊ भिलारे, गणेश भोकरे, नीलेश हांडे, हेमंत जगताप, रवी साने, कपिल जगताप, नीलेश धुमाळ उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, केंद्राच्या शहरी पूर नियंत्रण योजनेत पुणे, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळूर, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. मी महापौर असताना पुणे महापालिकेने या संदर्भातला आराखडा केंद्र सरकारकडे सुपूर्द केला होता. त्या आराखड्याला मान्यता मिळाली असून शहराच्या विविध भागांमध्ये 250 कोटी रुपयांची पूरनियंत्रणासाठी कामे होणार आहेत.
मोहोळ पुढे म्हणाले, पूराच्या पाण्याच्या अंदाज घेण्यासाठी सेन्सर्स बसविणे, धोकादायक ठिकाणी कॅमेरे बसविणे, पाणी टेकड्यांवर जिरवण्यासाठी उपाय करणे, कल्व्हर्ट बांधणे, नाल्यांचे ड्रोन मॅपिंग करणे, गटारांची क्षमता वाढविणे, सांडपाणी व्यवस्थापन करणे, गॅबियन वॉल उभारणे, कमांड कंट्रोल रूम उभारणे अशा प्रकारची कामे केली जाणार आहेत. पाच वर्षांपूवी आंबील ओढ्याला आलेल्या पुरात नुकसान झालेल्या सोसायट्या आणि नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.
Reviewed by ANN news network
on
५/०३/२०२४ ०९:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: