विठ्ठल ममताबादे
उरण : उरण परिसरात उरण ते कळंबोली, कोपरखैरणे व जुईनगर ते वशेणी या मार्गावर ३०, ३१ व ३४ क्रमांकाने धावणाऱ्या एनएमएमटीच्या बसेस २२ फेब्रुवारी २०२४ पासून अचानकपणे बंद करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे उरण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नोकरी, व्यवसाय, कामधंदा, शिक्षण व कार्यालयीन कामानिमित्त दररोज नवी मुंबईकडे जाणाऱ्या येणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच माध्यमिक शालांत परीक्षा सुरु असल्याने परीक्षेसाठी जाणार्या विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत.
प्रवाशांची ही सार्वजनिक वाहतूक सुविधा नवीमुंबई महानगरपालिकेने तसेच नवी मुंबई मुन्सिपल ट्रान्सपोर्टने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अचानक बंद केलेली आहे ती तातडीने सुरु करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आली आहे.
बससेवा तातडीने सुरु केली नाही तर सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी उरण-चारफाटा येथे सी.आय.टी.यू., किसान सभा, जनवादी महिला संघटना, डी. वाय. एफ.आय. व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, रायगडच्या यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांची राहील, असा इशारा माकपतर्फे देण्यात आला आहे.
तसेच उरणच्या नागरिकांनी आणि एनएमएमटीच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या धरणे आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आंदोलन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: