'आंतर-भारती' दिवाळी अंकाचे प्रकाशन
पुणे : ज्येष्ठ कादंबरीकार आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांनी संपादित केलेल्या 'आंतरभारती' या दिवाळी अंकाचे प्रकाशन संगणकतज्ज्ञ,लेखक अच्युत गोडबोले,संविधान अभ्यासक प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांच्या हस्ते ४ नोव्हेबर रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद(सदाशिव पेठ) येथे झाले.आंतरभारती ट्रस्ट चे अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.डॉ.लक्ष्मीकांत देशमुख , न्या.जी.डी. पारिख(निवृत्त) यांचीही विशेष उपस्थिती कार्यक्रमाला होती.
आंतरभारती चे राष्ट्रीय सचिव डॉ.डी.एस.कोरे,पुणे शाखेच्या अध्यक्ष अंजली कुलकर्णी, प्रा . शमसुद्दिन तांबोळी, डॉ सतीश देसाई, सूर्यकांत कुळकर्णी , प्रा.अविनाश कोल्हे , प्रा. प्रकाश चौधरी,स्वाती दाढे , शरद जावडेकर, चैत्रा रेडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
सविता कुरुंदवाडे यांनी सूत्रसंचालन केले.
यंदाचा आंतरभारती दिवाळी अंक हा 'मूलभूत अधिकार,कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे विशेषांक'आहे.त्यामुळे ' या संवैधानिक मूल्य त्रयींवर अच्युत गोडबोले,प्रा.गौतमीपुत्र कांबळे,डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांची व्याख्याने या कार्यक्रमात झाली.
अर्थव्यवस्थेतील विषमता धोकादायक : डॉ. अच्युत गोडबोले
डॉ अच्युत गोडबोले म्हणाले, ' आंतरभारती हा दिवाळी अंक वाचनीय असुन सर्वत्र पोचला पाहिजे. अर्थसत्तेच्या केंद्रीकरणाला संविधानात विरोध असून सर्वांना समान संधी देण्याचा उच्चार केला पाहिजे. स्मॉल ,मायक्रो, मिनी, ( एमएसएमई ) हे क्षेत्र नोटा बंदीनंतर संपल्यात जमा आहेत.१ टक्का लोकांकडे ५८ टक्के संपत्ती आहे.कर्जबाजारीपणा समाजात वाढला आहे. संपत्ती आणि उत्पन्नातील विषमता या वेगवेगळया असून ही विषमता वाढत आहे. मुक्त अर्थव्यवस्थेनंतर अनेक गोष्टी बदलत चालल्या आहेत. देश महासत्ता झाला , विश्वगुरू झाला ही भंकस, फसवी चर्चा आहे. आपण शिक्षण, आरोग्याकडे सतत दुर्लक्ष केले आहे.
मुक्त अर्थव्यवस्थेमुळे मध्यम , उच्च मध्यवर्ग प्रगत झाला. पण खालच्या स्तरातील गरीब अधिक गरीब झालेत.मानवी प्रगतीच्या ४२ पैकी ४० मानांकनात (इंडेक्स) भारत मागे आहे. सर्व सरकारांना काळा पैसा बाहेर काढण्यात रस नाही. विषमता संपेपर्यंत आर्थिक प्रगती तळातील वर्गापर्यंत पोचणार नाही. या सरकारच्या काळातही प्रगती झाली आहे, पण ती अपुरी आहे. शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, स्वस्त गृह बांधणी,उर्जा अशा क्षेत्रात सरकारने पुढील दहा वर्षे प्रचंड काम केले तर सर्वांना प्रगतीच्या समान संधी मिळतील.
लोकशाहीचा संकोच होत आहे: डॉ. लक्ष्मीकांत देशमुख
डॉ लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले,' जगण्याचा मूलभूत अधिकार घटनेने दिले आहेत. त्याचा संकोच होत आहे. समतेचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. सरकारांचे मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष झाले आहे. आजही सामाजिक लोकशाही प्रस्थापित करू शकलो नाही. निती आणि नियत च्या पकडीत आपण सापडलो आहोत. माहितीचा अधिकार कमकुवत झाला आहे.युएपीए, मनी लाँडरिंग सारखे फायदे सूडबुद्धीने वापरले जात आहेत. लोकशाहीचा संकोच होत आहे. गोडसेचा उदो उदो होत आहे.धार्मिक ध्रुवीकरण केले जात आहे.आपल्या अधिकारांचे रक्षण आपण केले पाहिजे. पुढील युग यंत्राधिष्ठीत आणि शोषणाचे राहील याची भीती आहे, गरिबांचा कोणी वाली राहील असे वाटत नाही .
दारिद्रय रेषेप्रमाणे श्रीमंत रेषा असली पाहिजे: प्रा. कांबळे
प्रा. गौतमीपुत्र कांबळे म्हणाले,' आंतर भारती चा प्रयोग देशासाठी महत्वाचा आहे. संविधानाचे अधिकार गरीब, वंचितांना मिळत नाहीत, याचा विचार केला पाहिजे. भारतात सर्व प्रकारची विषमता गाडून समतेवर समाज उभा केला पाहिजे. संविधान अभ्यासून त्याची संहिता अमलात आणली पाहिजे. भारत हा श्रीमंत लोकांचा गरीब लोक असता कामा नये, याचा प्रयत्न केला पाहिजे. संविधानाबाबत चर्चेपेक्षा प्रयत्नांवर भर दिला पाहिजे. लोक(पर्सन ), आणि नागरिक ( सिटीझन ) यांना असलेले अधिकार वंचितांना कसे मिळतील , याची काळजी केली पाहिजे. भारतात आजही राजरोसपणे अस्पृश्यता पाळली जाते.
न्यायपालिका तांत्रिकतेच्या जंजाळात अडकली असून न्याय मिळत नाही. संविधान न वाचलेले लोक बहुसंख्येने आढळतील.नोकरशाहीने संविधान पाळायचे ठरवल्यास देश सुधारण्यास वेळ लागणार नाही. दारिद्रय रेषेप्रमाणे श्रीमंतीची रेषा ठरवण्याची गरज आहे.
प्रबोधनपर वैचारिक दिवाळी अंक'आंतर-भारती' या दिवाळी अंकाचे हे पाचवे वर्ष आहे .आंतरभारती ही पूज्य साने गुरुजींच्या विचारांवर आधारित राष्ट्रीय एकात्मता , भारताची बहू धार्मिकता , बहू सांस्कृतिकता , बहू भाषिकता , बंधुता व सहिष्णुता जोपासण्यासाठी आणि प्रबोधनासाठी गेली पन्नास वर्षे काम करणारी स्वायत्त संस्था आहे . प्रबोधनपर वैचारिक दिवाळी अंक ही आंतरभारती दिवाळी अंकाची आता सर्वमान्य व सर्वज्ञात ओळख बनली आहे .'मागील ७५ वर्षांत भारतीय नागरिकांमध्ये संविधानातील 'मूलभूत अधिकार,कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे' याविषयी किती जागरूकता निर्माण झाली , या साऱ्या प्रश्नांचा वेध घेणारे ,तत्त्वज्ञान , संकल्पना आणि संविधानिक महत्त्व उलगडून टाकणारे वैचारिक लेख ,मुलाखती व परिसंवाद यांनी हा अंक संपन्न आहे . वाचकांना नवे मूल्यभान देणारा हा अंक आहे',असे डॉ लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले. न्या ए पी शाह,यशवंत मनोहर,डॉ नितीश नवसागरे,डॉ अशोक चौसाळकर,डॉ डी एस कोरे,डॉ चैत्रा रेडकर,प्रकाश पवार,सुभाष वारे,डॉ शमसुद्दीन तांबोळी,डॉ हमीद दाभोलकर,अंजली कुलकर्णी,शरद जावडेकर,विजय चोरमारे,प्रा.अविनाश कोल्हे,कलीम अजीम आदी मान्यवरांनी या अंकासाठी लेखन केले आहे
अर्थव्यवस्थेतील विषमता धोकादायक : डॉ. अच्युत गोडबोले
Reviewed by ANN news network
on
११/०४/२०२३ ०८:१८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/०४/२०२३ ०८:१८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: